किनाऱ्यांवरील 12 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे स्थलांतरण; मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीवर लक्ष

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी मुख्य सचिव तसेच मदत व पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. तर राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या या वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालीन व्यवस्थापन आणि नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांचे या चक्रवादळाने नुकसान झाले आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. आज दुपारी मुख्यमंत्री राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीतही आढावा घेणार आहेत.

रत्नागिरी  जिल्ह्यातील 3 हजार 896  ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 आणि रायगड जिल्ह्यातील  8 हजार  380  लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.  मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.

अजित पवार यांनीही घेतला परिस्थितीचा आढावा

उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली तसेच बचाव व मदतकार्यासाठी पूर्वतयारीची माहिती घेतली. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात उपस्थित राहून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून राज्यातील वादळ परिस्थितीवर व्यक्तीश: लक्ष ठेवून आहेत. तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.

रायगडात 23.42 मिलिमीटर पाऊस

रायगड ( Raigad) जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर  जाणवू लागला. सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत आहे. या दरम्यान जिल्ह्यातील आज सकाळी  9.00 वाजेपर्यंत झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. आतापर्यंत एकूण 23.42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील 839 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. एका व्यक्तीचा मृत्यू व दोन व्यक्ती जखमी झाल्याची नोंद झाली आहे. त्याचबरोबर एका प्राण्याचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 2 हजार 263 कुटुंबांचे मिळून एकूण 8 हजार 383 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *