मुंबईत समुद्राला उधाण तर पालघरमध्ये मुसळधार; पुढचे तीन तास ठरणार महत्त्वाचे

तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम रविवारी रात्रीपासूनच मुंबई व पालघर जिल्ह्याला जाणवायला लागला आहे. तौक्ते चक्रीवादळ मुंबई किनारपट्टीपासून १२० किमी अंतरावर आहे. हे वादळ वेगानं पुढे सरकत असून राजस्थान व गुजरातला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. तर, मुंबई, ठाणेसह पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार पुढचे तीन तास पालघर जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

पालघर किनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम जाणवायला सुरुवात झाली आहे. पहाटेपासूनच सोसाट्याचा वारा व पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. वसई-विरार परिसरात ढगांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळं किनारपट्टीवर राहणाऱ्या रहिवाश्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पालघरमध्ये दुपारी भरती असल्यामुळं वाऱ्याचा वेग व पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळं पुढचे तीन सात महत्त्वाचे ठरणार आहेत. पावसाचा जोर वाढल्यानं नागरिकांनी घराच्या बाहेर न पडण्याचं आवाहन, पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. तसंच, कच्चा घरात राहत असल्यास नजीकच्या शाळेत आसरा घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.

मुंबईत पावसानं दाणादाण उडवून दिली आहे. अनेक सखल भागात पाणी शिरले असून वाहतूकही ठप्प झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव वांद्रे वरळी सी-लिंकही पुढील निर्णयापर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. तर, मुंबई विमानतळ संध्याकाळी चारपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. मुंबईत वाऱ्याचा वेग ही ११४ किलोमीटर प्रति ‌तास एवढा वेग नोंदविला गेला आहे. त्यामुळं मुंबईत पुढचे काही तास मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *