नियम मोडणाऱ्यांकडून आठ लाखांचा दंड वसूल

मिरा-भाईंदरमध्ये करोनाचा संसर्ग वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेकडून विविध उपययोजना केल्या जात आहेत. नागरिकांना अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले जात आहे. मात्र तरीदेखील नागरिक घराबाहेर पडून नियमांचे उल्लंघन करत असल्याने मागील महिनाभरात पालिकेने कारवाई करत त्यांच्याकडून आठ लाखांचा दंड वसूल केला आहे.

मिरा-भाईंदर शहरात बाधित रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत असल्याने राज्य सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी दिले. तसेच सुरक्षित वावर ठेवणे, मास्कचा वापर करणे, अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त रस्त्यावर न फिरणे, गर्दीच्या ठिकाणी नियंत्रण ठेवणे आदींवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका उपायुक्त अजित मुठे यांच्या नियंत्रणाखाली सहा प्रभागांत ५७ पथके तयार करण्यात आली होती. विनामास्क फिरणारे, मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडणारे, चुकीच्या पद्धतीने मास्क घालणारे, मर्यादित वेळेनंतर दुकाने सुरू ठेवणारे व सुरक्षित वावराचे नियम न पाळणारे अशांकडून एक महिन्याच्या कालावधीत आठ लाख रुपयांहून अधिकचा दंड वसूल केला आहे. ३००हून अधिक जणांची करोना चाचणी करण्यात आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.

पेट्रोल पंपावर कारवाई

अत्यावश्यक सेवेतीलच वाहनांना इंधन देण्याची परवानगी पेट्रोल पंपचालकांना देण्यात आली आहे. मात्र तरीदेखील प्रभाग सहामधील कशिमिरा येथील दोढीडा पेट्रोल पंपावर अन्य वाहनांनादेखील ओळखपत्र न तपासताच इंधन दिले जात होते. त्यामुळे रविवारी प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांच्या पथकाने पेट्रोल पंपावर कारवाई करत २५ हजारांचा दंड वसूल केला. यावेळी पेट्रोल पंपचालकाने गोंधळ घालून राजकीय व्यक्तींच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्नदेखील केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *