पाण्याच्या शोधात फिरणाऱ्या ११ नीलगायींचा विहिरीत बुडून मृत्यू

वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील वरदरी खुर्द परिसरातील शेत शिवारात ११ नीलगायींचा (रोहे) विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी ही घटना घडली. उशिरा रात्री सर्व नीलगायींचे मृतदेह जेसीबीच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत.

गावातील एक व्यक्ती या परिसरात सरपण वेचण्यासाठी गेला होता. विहिरीजवळ गेला असता त्याला विहिरीत नीलगायींचे मृतदेह तरंगताना दिसून आले. त्याने लगेचच या घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली. पाणी काटेपूर्णा अभयारण्याच्या परिसरातील हा भाग येतो. या भागात रोही, बिबटे व इतर वन्य प्राण्याचा नेहमीच या परिसरात वावर असतो. ज्या विहिरीत हा ११ नीलगायींचा कळप पडला, त्या विहिरीला संरक्षक कठडा नव्हता. ही विहीर जमिनीशी समांतर होती. त्यामुळेच पाण्याच्या शोधात एकाच ठिकाणी आलेल्या नीलगायी विहिरीत पडल्या असाव्यात, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर काल उशिरापर्यंत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत नीलगायींना जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढले. नंतर शासकीय नियमांनुसार पंचनामा करून मृतदेहची विल्हेवाट लावण्यात आली.

आज जागतिक जलसंधारण दिन आहे. जलसंधारण दिनाच्या पूर्वसंध्येला अशी दुर्दैवी घटना समोर आल्याने वन्यजीव प्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरवर्षी वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला जातो. या प्राण्यांसाठी पाणवठेही बनवले जातात. असे असूनही पाण्याच्या शोधात हे प्राणी आपला जीव का गमावतात, असा प्रश्न वण्यप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *