ठाणे ग्रामीणमधील आश्रमशाळा, वसतिगृहे सोमवारपासून बंद

करोना रुग्णांचा वाढता आलेख लक्षात घेता ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळा, वसतिगृहे आणि निवासी शाळा सोमवार, २२ मार्चपासून बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, दहावी-बारावीचे विद्यार्थी त्यांच्या इच्छेनुसार अभ्यासाच्या सोयीसाठी वसतिगृहात राहू शकतात. याकाळात विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन प्रणालीद्वारे शिक्षण सुरू ठेवावे, असेही या आदेशात नमूद केले आहे.

करोना संचारबंदीच्या काळात तब्बल दहा महिने आपापल्या घरी असलेली आश्रमशाळेतील मुले २७ जानेवारीला शाळेत आली होती. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या आतच पुन्हा एकदा करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे त्यांच्या अभ्यासात खंड पडणार आहे. आश्रमशाळेतील आदिवासी मुले, मुली ठाणे, पालघर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी गावपाड्यांमध्ये राहतात. तिथे काही ठिकाणी नेटवर्कचा अभाव आहे. अनेक कुटुंबांकडे ऑनलाइन अभ्यासासाठी आवश्यक अँड्रॉइड मोबाइल संच नाहीत. त्यामुळे शिक्षणाचा ऑनलाइन पर्याय येथील हजारो विद्यार्थ्यांना फारसा उपयोगाचा नाही.

जव्हार तालुक्यातील दाभोसा आश्रमशाळेचे अधीक्षक किशोर गाडीलोहार (४३) यांचे करोनाने शुक्रवारी पहाटे निधन झाल्याची घटना घडली.
आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हारमार्फत ३० आश्रमशाळा व १६ वसतिगृहे आहेत. काही अनुदानित आश्रमशाळा असून, यामध्ये जवळपास २० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जानेवारी महिन्यात नववीपासून पुढील वर्ग भरविण्यास सुरुवात झाली. काही दिवसांनी आदिवासी विकास विभागाचे सरकारी आश्रमशाळा, विनवळ येथील सेंट्रल किचन सुरू करण्यात आले.

विनवळच्या सेंट्रल किचनचा प्रभारी अधीक्षक पदाचा कार्यभार दाभोसाचे अधीक्षक गाडीलोहार यांना सोपविण्यात आला होता. ते नाशिकला राहत असत. नाशिकहून ये-जा करीत होते. त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी नाशिक येथे करोना तपासणी केली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यातच त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *