भारताला पुराचा धोका

भारताला पुराचा धोका

नेपाळमध्ये भूकंपानंतर भारतासमोर आता पुराचे नवीन संकट उभे राहिले आहे. भूकंपामुळे हजारो दरडी नेपाळच्या मोठमोठय़ा नदीत कोसळल्या आहेत. त्यामुळे या नद्यांचा मार्ग रोखला आहे. त्यामुळे तेथे कृत्रिम तलाव निर्माण झाले आहेत. ते तलाव फुटल्यास भारतातील उत्तर प्रदेश, बिहारमध्ये पूर येऊन हाहाकार माजू शकतो, असा इशारा नेपाळने भारताला दिला आहे.

नेपाळचे नवलपारसी जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा अधिकारी हरिप्रसाद मैनाली यांनी सांगितले की, भूकंपानंतर काली गंडकी आदी नद्यांमध्ये दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे या नद्यांचे मार्ग रोखले गेले असून कृत्रिम तलाव निर्माण झाले आहेत.

हे तलाव कोणत्याही वेळी फुटू शकतात. त्याचा मोठा फटका भारताला बसू शकतो. नदीच्या किना-यावर सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात केले आहेत. नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, असे त्यांनी सांगितले.

म्यागदी जिल्ह्यातील काली गंडकी नदीत दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे नदीचा ९५ टक्के मार्ग अडवला गेला आहे. त्याच्या परिणामी खोल व मोठा तलाव निर्माण झाला आहे. तो चार किलोमीटर लांब असून २०० मीटर रुंद आहे. या तलावात १.५ दशलक्ष क्युबिक लिटर पाणी आहे. काली गंडकी ही नदी मध्य नेपाळ व उत्तर भारतातून वाहते. काली व त्रिशुली नदीच्या उपनद्यांतून ही मोठी नदी बनते.

सर्वसाधारणपणे पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात. मात्र, आता भूकंपामुळे जमिनीला भेगा पडल्या असून दरडी कोसळण्याचे प्रकार वाढले आहेत. २५ एप्रिल रोजी झालेल्या भीषण भूकंपानंतर नेपाळमध्ये दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *