नाणार प्रकल्प कोकणातच राहणार

रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात नाणार येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पावरून सत्ताधारी शिवसेना व भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. लोकांना नको असेल तर हा प्रकल्प होणार नाही अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. मात्र, अद्याप महाविकास आघाडी सरकारनं कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्याचवेळी, भाजपचे नेते व माजी खासदार नीलेश राणे यांनी हा प्रकल्प कोकणातच राहणार असल्याचा दावा केला आहे. हा दावा करताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

नाणार प्रकल्पाच्या संदर्भात नीलेश राणे यांनी एक ट्वीट केलं आहे. ‘नाणार प्रकल्प राजापूर तालुक्यात जिथं आहे, तिथेच राहील हे १०० टक्के. खासदार विनायक राऊत यांना कोण विचारतं? मुख्यमंत्र्याच्या नातेवाईकाने प्रकल्पबाधितांच्या जमिनीमध्ये कमिशन घेतले आहे. तसंच, जमीन खरेदी देखील केलेली आहे. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आहे त्याच जागेवर प्रकल्प ठेवणार. पडद्याआड सगळं ठरलं आहे,’ असं नीलेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

मधल्या काळात नाणार प्रकल्पाबद्दल शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी एक वक्तव्य केलं होतं. कोकणात रोजगाराचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळं नाणार प्रकल्प व्हावा अशी स्थानिकांची मागणी आहे. भविष्यात तशी मागणी झाल्यास मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, असं वक्तव्य राजन साळवी यांनी केलं होतं. त्यामुळं गोंधळ उडाला होता. साळवी यांचं हे वैयक्तिक मत असल्याचा खुलासा शिवसेनेनं कालांतरानं केला होता. मात्र, नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेतच मतभेद असल्याची बाब त्यातून पुढं आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *