उच्च शिक्षणासाठी शहरात आलेल्या तरुणाने नागेश्वरवाडी भागात राहत्या खोलीतील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सागर पोपटराव पोळ (वय – २२, रा. पोळशंकरपूर, गंगापूर, ह. मु नागेश्वरवाडी, औरंगाबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे. कौटुंबिक वादानंतर नैराश्य आल्याने त्याने आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी सागर हा शहरात आला होता. नागेश्वरवाडी भागात सागर हा एका खोलीत राहत होता. काही दिवसांपासून पोळ कुटुंबात वाद सुरू होते. त्यामुळे त्याला नैराश्य आले होते. कुटुंबीयांनी त्याची समजूत देखील काढली होती. परंतु, गुरुवारी सकाळी त्याने टोकाचे पाऊल उचलले. गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार डी. जे. शिंदे हे तपास करीत आहेत.
