सध्या रायगडात पर्यटनाचा हंगाम सुरु आहे.दररोज हजारो पर्यटक जंजिरा किल्ल्याला भेट देण्यासाठी येतात.मात्र जिल्हाधिकार्यांनी अन्यायकारण आदेश दिल्याने या निषेधार्थ जल वाहतूक सोसायट्यांनी किल्ल्यावरील संपूर्ण वाहतूकच बंद ठेवली आहे.आज चार दिवसानंतरही प्रशासन आणि जल वाहतुकदारांमधील वाद संपुष्टात आलेला नाही, त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे.जंजिरा किल्ल्यावर वाहतूक करणार्या पाच जल वाहतूक सोसायट्या आहेत. 400 लोकांची अट ठेवल्याने प्रत्येक सोसायटीला कमी माणसांची वाहतूक करण्यास मिळत आहे. शिवाय जंजिरा किल्ला पहाण्यासाठी शनिवार रविवारी या सुट्ट्यांच्या दिवसात हजारोच्या संख्येने पर्यटक येत असतात. अशा वेळी मोजक्याच लोकांना नेल्याने पर्यटक व बोट कर्मचारी यांच्यात वाद निर्माण होत असल्याने जल वाहतूक करणार्या सोसायट्यांची आपली जल वाहतूक बंद केली आहे.किल्ल्यावरील वाहतूक बंद असल्याने असंख्य पर्यटक किल्ला न पाहताच निघून जात आहेत. पर्यटक मोठ्या अपेक्षेने जंजिरा किल्ला पहाण्यासाठी येतात. परंतु जल वाहतूक बंद ठेवल्याने पर्यटकांना किल्ला पहाता येत नाही.शनिवार रविवार सोडून काही पर्यटक येत आहेत.
परंतु जल वाहतूक बंद ठेवल्याने किल्ल्यापर्यंत जाता येत नसल्याने पर्यटक दूर जेट्टीवरूनच किल्ला पाहून माघारी जात आहेत.याबाबत जंजिरा किल्ल्याचे संवर्धक सहाय्यक बजरंग येलीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,रायगडच्या जिल्हाधिकारी यांनी दुसरा एक आदेश काढला असून या आदेशात प्रत्येक दिवसाला 400 लोकांची अट ठेवली आहे. आम्ही जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करीत आहोत. चारशे पर्यटक संख्या झाल्यावर कोणालाही किल्ल्यात प्रवेश देणार नाही.याबाबत मुरुड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक उपाध्यक्ष इस्माईल सिद्धीकी यांनी सांगितले की,जंजिरा किल्ल्यावरील वाहतूक बंद झाल्याने स्थानिकांचा रोजगार बुडाला आहे.जंजिरा किल्ल्यावर पार्किंग,ऑटो,स्टॉल व हॉटेल असे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत.जिल्हाधिकार्यांनी पर्यटकांच्या संख्येवरील बंधन दूर करावे.

