शिक्षकेतर कर्मचारीभरती करण्याची मागणी

शाळा नेमक्या कधीपासून सुरू करायच्या, याचा निर्णय अजून झालेला नाही. मात्र, शाळा सुरू होतील, तेव्हा शाळांची नियमित साफसफाई व स्वच्छता हा सर्वांत मोठा प्रश्न असेल. त्यासाठी शाळांना अतिरिक्त सेवक-शिपायांची गरज भासेल. त्यासाठीच २००१ पासून रखडलेली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती पुन्हा सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

राज्यात २००१-०२ पासून शालेय शिक्षण विभागात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बंद आहे. शिक्षकेतर पदे निश्चित करून तातडीने पदभरती करण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळासह अनेक संघटनांनी वारंवार आंदोलने केली, मोर्चेही काढले. त्यानंतर सरकारने २८ जानेवारी २०१९ रोजी शासन आदेश काढून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची काही प्रमाणात भरती करण्यास परवानगी दिली होती; परंतु शिपाई व सेवक कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत निर्णय प्रलंबित ठेवला होता. आताही करोनाच्या पार्श्वभूमीवर चार मे २०२० रोजी सरकारने आदेशद्वारे नवीन नियुक्ती करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे ही पदे रिक्तच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अनेक खासगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांना शालेय परिसराची साफसफाई, विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित वावर ठेवणे, त्यानुसार शालेय फर्निचर मांडणी व अन्य बाबींची स्वच्छता, स्वच्छतागृह आदी कामांसाठी शाळांत सेवकांची, शिपाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी सांगितले.

राज्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला बंदी असल्याने ही सेवक, शिपाई पदे रिक्तच आहेत. या पार्श्वभूमीवर तातडीने शाळांमध्ये सेवक, शिपाई कर्मचारी भरती करण्याची परवानगी दिली जावी, अशी आमची मागणी आहे.

– प्रसन्न कोतुळकर, जिल्हा उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *