बाहेरुन चंद्रपुरात परतलेल्या ३१ हजार नागरिकांचा होम क्वारंटाइन पूर्ण

चंद्रपूर जिल्ह्यातून शिक्षण, नोकरी व रोजगाराच्या निमित्तानं परराज्यात आणि अन्य जिल्ह्यांमध्ये गेलेले सुमारे ३३ हजार नागरिक लॉकडाउदरम्यान परवानगी घेऊन पुन्हा चंद्रपूरमध्ये दाखल झाले आहेत. यांपैकी ३१ हजार १३८ नागरिकांनी १४ दिवसांचा होम क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण केला आहे. तर २,५५० नागरिक अद्यापही होम क्वारंटाइनमध्ये आहेत. बाहेरून येणाऱ्या नागरिकांकडूनच करोनाचा धोका असल्याने त्यांनी माहिती लपवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

बाहेरून येणाऱ्या नागरिकांबाबत पोलीस प्रशासन अतिशय गंभीर असून प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. ही तपासणी आपल्या स्वतःसाठी व कुटुंबासाठी आवश्यक आहे. त्यामुळे सगळ्याच यंत्रणेला चुकवून जरी कोणीही जिल्ह्याच्या कोणत्याही भागात वा शहरात पोहोचले असेल तर सामाजिक दायित्व म्हणून स्वतःची माहिती आरोग्य विभागाला देण्याबाबतचे आवाहन करण्यात आले आहे.

लॉकडाउन लागल्यापासून अनेक कर्मचारी कार्यालयात पोहोचले नाही, अशा कर्मचाऱ्यांनी तातडीने आपापल्या कार्यालयात रुजू होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश काढले आहेत. या काळात नियमित कामकाज सुरू करण्यात यावे संबंधित पोलीस विभागाची परवानगी घेऊन कर्तव्यावर रुजू व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, कोटा येथे विविध परीक्षांची तयारी करण्यासाठी गेलेले जिल्ह्यातील ३९ विद्यार्थी अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राज्य शासनाने तयारी सुरू केली असून त्याचा लाभ चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांनाही मिळेल अशी अपेक्षा आहे. नागपूर यवतमाळ हे दोन जिल्हे रेड झोनमध्ये असून भंडारा जिल्ह्यांमध्ये देखील रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या जिल्ह्याच्या सीमांवरून प्रवेश करताना विनापरवाना कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही. त्यासाठी नाकाबंदी आणखी कडक करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने पोलिसांना दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *