राज्यात करोनाचा कहर कायम; आज ३२ मृत्यू, ५९७ नवीन रुग्ण

महाराष्ट्रात करोनाचा कहर कायम आहे. राज्यात आज करोनाचे ५९७ नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या दहा हजाराच्या जवळ पोहचली आहे. चिंतेची बात म्हणजे राज्यात काल करोनामुळे ३१ जणांचा मृत्यू झाला होता तर आज ३२ रुग्ण दगावले आहेत. राज्यात आतापर्यंत करोनामुळे ४३२ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आज करोनाच्या ५९७ नवीन रुग्णांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या ९ हजार ९१५ झाली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत असून आज एकाच दिवसात २०५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत १ हजार ५९३ रुग्णांनी करोनाला हरवण्यात यश मिळवले आहे. हा आकडा वाढावा म्हणून आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे.

मुंबईतील करोना मृत्यूदर सर्वाधिक आहे. राज्यात आज एकूण ३२ रुग्णांचा मृत्यू झाला त्यात मुंबईतील २६ रुग्णांचा समावेश आहे. पुण्यात तीन तर सोलापूर, औरंगाबाद आणि पनवेलमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा करोनाने मृत्यू झाला. एकूण मृतांपैकी २५ पुरुष आहेत तर ७ महिला आहेत. त्यात ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण तर १५ रुग्ण ४० ते ५९ वयोगटातील आहेत. ३२ पैकी १८ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार होते.
कालच्या तुलनेत राज्यात करोनाबाधित नवीन रुग्णांच्या संख्येत थोडी घट पाहायला मिळाली. मंगळवारी राज्यात करोनाचे ७२९ नवीन रुग्ण आढळले होते. त्याजागी आज करोनाचे ५९७ नवीन रुग्ण आढळले. हाच कायतो दिलासा म्हणता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *