श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमधील शोपयां येथे सुरक्षाबलाचे जवान आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. या पैकी पहिला दहशतवादी मंगळवारी ठार झाला, तर दुसरा आज बुधवारी सकाळी ठार झाल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.
शोपियां जिल्ह्यातील जैनपोरा भागात दहशवादी लपले असल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली. त्यानंतर भारतीय लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाने शोधमोहीम हाती घेतली. या दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. भारतीय जवानांनी प्रयुत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले.
काश्मीरमध्ये गेल्या ११ दिवसांमध्ये सुरक्षाबल आणि दहशतवाद्यांमध्ये विविध ठिकाणी चकमकी झाल्या आहेत. या चकमकींदरम्यान आतापर्यंत १५ दहशतवादी ठार झाले आहेत. तर एका दहशतवाद्याला अटकही करण्यात आली आहे. या दरम्यान, एकूण ३ भारतीय जवान शहीद झाले असून २ जवान जखणी झाले आहेत.
गेल्या तीन दिवसांमध्ये दहशतवाद्यांशी सुरक्षादलाची झालेली ही तिसरी चकमक आहे. सोमवारी श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर काजीगुंड येथे सुरक्षादलाशी दहशतवाद्यांची चकमक झाली होती. लष्कराच्या गस्त घालणाऱ्या पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. उत्तरादाखल केलेल्या गोळीबारात ३ दहशवादी ठार झाले होते. तर, रविवारी दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात अस्थाल भागातही चकमक झाली होती. यात १ दहशतवादी ठार झाला होता.
