करोनावर भारतातच नव्हे, तर जगातही कोणतीच सर्वमान्य उपचार पद्धती आज अस्तित्वात नाही. करोना रुग्णांवरील प्लाझ्मा उपचारपद्धती सध्या बरीच चर्चेत असली तरी ती पूर्णपणे बेकायदेशीर असून त्यामुळे करोना रुग्णाच्या जीवालाही धोका उद्भवू शकतो, असा अतिशय स्पष्ट इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मंगळवारी दिला.
सध्याच्या काळात प्लाझ्मा उपचारपद्धतीसह करोनावरील उपचारासाठी कोणतीही मान्यताप्राप्त पद्धती नाही. करोना रुग्णांवर प्रायोगिक स्तरावर उपचार केल्या जात असलेल्या विविध पद्धतींमध्ये प्लाझ्मा उपचार पद्धतीचाही समावेश आहे. प्लाझ्मा उपचारपद्धतीचा करोनारुग्णांवर प्रयोग केला जात आहे. पण तिला उपचार म्हणून मानण्यासाठी कोणताही ठोस शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही. प्लाझ्मा पद्धतीचा निव्वळ प्रायोगिक स्तरावर उपयोग केला जात असून, ‘यूएसएफडीए’नेही त्याची एक प्रायोगिक पद्धती म्हणूनच दखल घेतली आहे. या उपचारपद्धतीची परिणामकारकता जाणून घेण्यासाठी आयसीएमआरने राष्ट्रीय पातळीवर अभ्यास हाती घेतला आहे. जोपर्यत आयसीएमआर आपल्या अभ्यासातून निष्कर्ष काढत नाही आणि ठोस शास्त्रीय पुरावे प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत या उपचार पद्धतीचा आम्हाला संशोधन किंवा प्रयोगाच्या उद्देशासाठीच वापर करावा लागेल,’ असे या संबंधात स्पष्ट करणे अत्यावश्यक असल्याचे मत आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.
‘प्लाझ्मा उपचारपद्धतीचा योग्य रितीने आणि मार्गदर्शक तत्वांनिशी वापर केला नाही तर त्यामुळे जीवाला धोका पोहोचवणारी गुंतागुंतही निर्माण होऊ शकते. जोपर्यंत या उपचारपद्धतीला मान्यता लाभत नाही किंवा तिची परिणामकारता सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्याविषयी कोणत्याही स्तरावर केलेला दावा अनुचित ठरेल,’ असे अग्रवाल म्हणाले. आयसीएमआरच्या मते, या उपचारपद्धतीचा प्रयोग पूर्णपणे बेकायदेशीर असून त्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोकाही उद्भवू शकतो. याबाबत आयसीएमआरने विस्तृत मार्गदर्शक तत्वे आधीच प्रसारित केली असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. करोनामुक्त व्यक्तीपासून धोका संभवत नाही. जे आधी बरे झाले त्यांना पुन्हा करोना झाला, अशा रुग्णांची संख्या खूपच कमी आहे. हा ठोस पुरावा नाही. जो बरा झाला तो ठीक आहे, असे मानले जात आहे. करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुरेपूर काळजी आणि आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले नाही तर ते करोनाग्रस्त होऊ शकतात. त्यामुळे त्यांनी आवश्यक काळजी घ्यावीच लागेल,’ असेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
