Coronavirus कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध ठिकाणी लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात येत असून, बहुतांश भागांमध्ये हे नियम आणखी कठोर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये काही ठिकाणी आता थेट दुचाकी वाहनांवरही बंदी घालण्याचा निर्णय घेणअयात आला आहे. झटपाट्याने वाढणारी कोरोना ,रुग्णांची संख्या पाहता यवतमाळमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी सकाळी नव्याने ११ कोरोनाग्रस्त आढळून आल्यामुळे आता ही परिस्थिती आणखी चिंतेची झाली आहे. इंदिरा नगर आणि इतर काही प्रतिबंधिक क्षेत्रांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा पाहता दुचाकी वाहनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२८ मार्चला कोरोनामुक्त झालेल्या यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. त्याला कारणही तसंच आहे. दुबईहून परतलेले ३ कोरोनाबाधित बरे झाल्यानंतर इथे कोरोनाचा वावर नव्हता. पण, लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच अंशी नागरिकांकडून इथे नियमांचं पालन केलं गेलं नाही. त्यातच निजामुद्दीन येथील मरकजमध्ये सहभागी झालेले नागरिक जिल्ह्यात आले आणि पाहता पाहता इंदिरा नगर, पवारसपुरा या दाटीवाटीच्या भागांमध्ये कोरोना झपाट्यानं पसरला.
इथे जवळपास ३०० नागरिकांना क्वारंटाईन ठेवण्यात आलं आहे. शिवाय प्रतिबंधीत क्षेत्राबाहेर कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून युद्धपातळीवर पावलं उचलली जात आहेत.
