शाळांनी निकाल तयार करावा

‘राज्यातील शाळांनी शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाप्रमाणे इयत्ता पहिली ते आठवी; तसेच नववी व अकरावीच्या निकालाची कार्यवाही ही विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन आणि प्रथम सत्राच्या आधारावर पूर्ण करायची आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून स्वतंत्र आदेश देण्यात येणार नाहीत,’ अशी माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली आहे. निकाल तयार करण्यासाठी लॉकडाउनच्या काळात शिक्षकांनी शाळेत जाण्याची आवश्यकता नसल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सोळंकी यांनी शुक्रवारी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या. राज्य सरकारच्या शालेय विभागाने आरटीई अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या. त्यानंतर इयत्ता नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात जाण्यासाठी वर्गोन्नती जाहीर केली आहे. सरकारच्या परिपत्रकानुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा निकाल प्रथम आणि द्वितीय सत्राचे मूल्यमापन करून, त्यांना श्रेणी द्यावी, तर इयत्ता नववी व अकरावी यांचे प्रथम सत्र अखेरचे मूल्यमापन आणि द्वितीय सत्रातील अंतर्गत मूल्यमापनाचा आधार घेऊन निकाल तयार करावा. या सरासरीला प्रचलित पद्धतीनुसार भाषा विषय गट, गणित व विज्ञान गट उत्तीर्णतेच्या निकषांनुसार अंतिम निकाल तयार करण्यात यावा, असेही सोळंकी यांनी सांगितले. या निकालाच्या प्रक्रियेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला नियमाप्रमाणे पुन:परीक्षेची संधी मिळेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *