आदेशाला हरताळ फासून दुकाने सुरू

वाढत्या रुग्णसंख्येमुळे कल्याण-डोंबिवली महापालिका परिसर बाधित क्षेत्र म्हणून जाहीर केला असून पालिका क्षेत्रातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने रविवारपासून बंद करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिले, मात्र तरीही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने रविवारी सकाळीच उघडण्यात आली. सकाळी ९ वाजल्यानंतर पोलिसांनी ही सर्व दुकाने बंद करण्यास भाग पाडले. अनेक दुकानदारांकडून जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यास नकार देत पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर अचानक दुकाने बंद झाल्यामुळे नागरिकांची धांदल उडाली. परंतु दुकाने बंद झाल्यानंतर रस्त्यावरील गर्दी कमी झाली.

कल्याण-डोंबिवलीमधील करोनाबाधितांचा आकडा १२९वर पोहोचला आहे. यापूर्वी डोंबिवलीत सर्वाधिक रुग्ण सापडलेला परिसर पालिका प्रशासनाकडून बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करत या भागातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद करण्यात आली. केवळ जीवनावश्यक वस्तू नागरिकांना घरपोच उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली. या भागात पालिका प्रशासनाने राबवलेल्या योजना यशस्वी ठरल्या असून हा परिसर करोनामुक्त झाला आहे. मागील १० दिवसांत या भागात एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. याच उपाययोजनेची अंमलबजावणी संपूर्ण शहरात करून कल्याण-डोंबिवली परिसर करोनामुक्त करण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून सुरू आहे. यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या आदेशानुसार पालिका आयुक्तांनी कल्याण-डोंबिवली परिसरातील सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. रविवारपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र अनेक विक्रेत्यांपर्यंत हा आदेश पोहोचलाच नाही. त्यामुळे सकाळीच नेहमीप्रमाणे जीवनावश्यक वस्तूची दुकाने उघडण्यात आली. नागरिकांनीदेखील खरेदीसाठी सुरक्षित वावर हा नियम पाळत लांबच लांब रांगा लावल्या, मात्र सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सर्व दुकाने बंद करत नागरिकांना घरपोच सामान देण्याचे आदेश दिले. यामुळे काही ठिकाणी पोलिसांबरोबर विक्रेत्यांनी हुज्जत घातली. तर अचानक दुकाने पूर्ण वेळेसाठी बंद करण्यात आल्यामुळे किती दिवस बंद राहणार, सामान कोठे मिळणार, यांसारख्या प्रश्नांची सरबत्ती नागरिकांनी सुरू केली.

सविस्तर यादी प्रसिद्ध करावी

पालिका प्रशासनाकडून दुकानदारांची फोन क्रमांकासह यादी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली असली, तरी यातील नेमका कोणता दुकानदार किंवा विक्रेता आपल्या घरापासून जवळ आहे, याची माहिती या यादीतून मिळत नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. प्रभाग क्षेत्राचा उल्लेख करत विक्रेत्यांची सविस्तर यादी प्रशासनाने प्रसिद्ध करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

भाजी मिळेना

मागील चार दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीत सुरक्षित वावर हा नियम धाब्यावर बसवला जात असल्यामुळे ठराविक विक्रेत्यांनाच भाजी मंडईत प्रवेश दिला जातो. पहाटे ५ ते ७ या दोन तासांतच घाऊक भाजीविक्री करता येत असल्यामुळे विक्रेते अतिशय कमी माल आणतात. अनेक भागांत मागील ४ ते ५ दिवसांपासून नागरिकांना भाजीच मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *