ठाण्यात वाढतोय करोना धोका

देशभरातील धोकादायक क्षेत्रांत समावेश असलेल्या आणि करोना काळजीत भर घालणाऱ्या क्षेत्रांमध्ये ठाण्याचा समावेश झाला असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही शुक्रवारी याबाबत चिंता व्यक्त केली. ठाणे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या साडेपाचशेच्या पार झाली असून केंद्र सरकारने त्याची दखल घेतली आहे. आज, शनिवारी केंद्र सरकारचे पथक ठाण्यातील स्थितीची पाहणी करण्यासाठी दाखल होणार आहे. ठाण्यात आतापर्यंत १७ जणांना करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सुरक्षित वावराच्या नियमाचेही सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे.

ठाणे महापालिकेच्या हद्दीतील करोनाबाधितांची संख्या आता दोनशेच्या जवळ पोहोचली असून कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर व नवी मुंबई या तिन्ही महापालिकांच्या हद्दीतही करोनाबाधितांच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी येथेही करोनाबाधितांची संख्या चिंताजनक आहे. तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही करोनाचा शिरकाव झाला असून तेथे १६ रुग्णांची नोंद झाली आहे. ठाणे शहरात सर्वात आधी कासारवडवली भागात पहिला परदेशातून आलेला बाधित आढळला होता. त्यानंतर डोंबिवलीतील लग्नसोहळ्यात उपस्थित राहिलेल्या करोनाबाधिताचे प्रकरण बरेच चर्चेत आले व त्यातून सभोवतीचा परिसर सील करण्याची वेळ आली. तरीही कल्याण-डोंबिवलीतील करोनाबाधेला अटकाव झाला नाही. ठाणे महापालिकेच्या हद्दीत कळवा, मुंब्रा, वर्तकनगर, वागळे इस्टेट या दाट लोकवस्ती असलेल्या भागांबरोबरच नौपाडा, मानपाडा, वृंदावन, कोलबाड या इमारती, सोसायट्या असलेल्या परिसरातही करोनाबाधित सापडू लागले. नवी मुंबईमध्ये कृषि उत्पन्न बाजार समिती या दररोज हजारोंच्या संख्येने वर्दळ असलेल्या व्यापारकेंद्रातही करोनाबाधित आढळले. त्यामुळे घाऊक बाजार बंद ठेवण्याचीही वेळ आली.

करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असताना व संचारबंदी सुरू झाल्यानंतरही जांभळीनाका तसेच इतर अनेक परिसरांमध्ये भाजीखरेदीची गर्दी हटेना. त्यामुळे १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण ठाणे जिल्हाभर फळे व भाजीपाल्याच्या किरकोळ विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना जारी करावा लागला होता. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांच्या सीमा बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना प्रवेशासाठी बंद करण्याचे पाऊल उचलण्यात आले. त्यानंतरही करोनाचा वाढता प्रादुर्भाव थोपवणे शक्य झालेले नाही. करोनाची लागण झालेल्यांमध्ये ठाणे जिल्ह्यातील डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, पोलिस यांच्याप्रमाणेच राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते, नेते यांचाही मोठ्या संख्येने समावेश आहे.

राज्यावर करोनाचे काळे ढग दाटी करून असतानाच तीन जिल्ह्यांनी मात्र या संसर्गाला वेशीबाहेर ठेवण्यात यश मिळवले आहे. विदर्भातील वर्धा, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात अद्याप एकाही करोनाबाधिताची नोंद झालेली नाही. जिल्हा प्रशासनाने याबाबत केलेल्या युद्धपातळीवरील प्रयत्नांना यश आल्याचे दिलासादायक चित्र आज दिसत आहे.

२०.५२ टक्के रुग्ण बरे

देशभरात एकूण ४८१४ करोना रुग्ण बरे झाले असून गेल्या २४ तासांत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४९१ इतकी आहे. करोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी २०.५२ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत करोनाच्या १७५२ नव्या रुग्णांची भर पडून देशभरातील करोनाग्रस्तांची संख्या २३ हजार ४५२ वर पोहोचली आहे. एका दिवसातील रुग्णसंख्या वाढण्याचा हा आजवरचा उच्चांक आहे. यापूर्वी २० एप्रिल रोजी एका दिवसात १५४० रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या २४ तासांत आणखी ३७ जण दगावले असून एकूण मृतांचा आकडा ७२३ वर पोहोचला आहे. सध्या वैद्यकीय देखरेखीखाली १७ हजार ९१५ रुग्ण आहेत.

करोनाबळी ३०० पार

महाराष्ट्रात गुरुवारच्या तुलनेत करोनाबाधित नवीन रुग्णसंख्येचा आकडा जवळपास निम्म्याने घटला असला तरी, राज्यात करोनाबाधित रुग्णांच्या बळीने तीनशेचा टप्पा ओलांडला आहे. शुक्रवारी ३९४ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या २४ तासांत राज्यात १८ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात ११ जण मुंबईतील तर पाच जण पुण्यातील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *