बोट दुर्घटना: तीन बेपत्ता व्यापाऱ्यांचा मृत्यू

मढहून वर्सोव्याला परतताना बोट बुडून झालेल्या अपघातात तीन बेपत्ता व्यापाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मलाड पश्चिमेला असणाऱ्या मढ जेट्टी इथं काल (१५ एप्रिल) दुपारी १.३० वाजल्याच्या सुमारास बोट बुडाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी बोटीमध्ये असलेल्या नागरिकांपैकी चार जणांचा वाचवण्यात यश आलं होतं. तर तीन जण बेपत्ता होते.

तीन जणांचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न करण्यात आले. अखेर आज या तीन बेपत्ता व्यापाऱ्यांचे मृतदेह सापडले आहेत. हे प्रकरण आता पोलिसांच्या हातात देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

वर्सोव्याच्या काही व्यापाऱ्यांची मढ बेटावर गोदामे आहेत. एरव्ही मढ-वर्सोव्यादरम्यान लॉन्च फेरी चालते. लॉकडाऊनमुळं सध्या ही फेरी बंद झाली आहे. यामुळं वर्सोव्याचे काही व्यापारी १५ दिवसांपासून मढला अडकून पडले होते. त्यांचा वर्सोव्याला येण्याचा मार्ग बंद झाला होता. या अस्वस्थतेतून त्यांनी मंगळवारी रात्री लहान होडीनं वर्सोव्यासाठी प्रवास सुरू केला. परंतु काही अंतर जात नाही तोच त्यांची होडी उलटली. होडीचा नावाडी व आंध्र प्रदेशच्या तीन कामगारांना पोहता येत होतं. त्यामुळं ते तिघे सुखरुप किनाऱ्यावर आले. परंतु सय्यद नाझीर (वय ५५ वर्षे), सादिक काझमामी (वय ४५ वर्षे) व युसूफ चौहान (वय ४८ वर्षे) हे तीन व्यापारी बुडाले आणि त्यांच्या मृत्यू झाला.

लॉकडाऊनमध्ये प्रवासी वाहतूक बंद असतानाही होडीमधून लाइफ जॅकेट न देता होडीतून प्रवासी घेऊन गेल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर पोलिसांकडून गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *