ऑनड्युटी असलेल्या पोलिसांमध्येही धाकधूक

करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असताना कस्तुरबा रुग्णालयाच्या आवारात २४ तास ऑनड्युटी असलेल्या पोलिसांमध्येही धाकधूक आहे. तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांचे नियोजन करण्यासाठी डॉक्टरांना मदत करणे, तपासणी तसेच उपचार घेणाऱ्या रुग्णांची दर दोन तासांनी माहिती घ्यावी लागते. त्यातच मंगळवारी मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांचा जबाब आग्रीपाडा पोलिसांनी घेतला. हे सर्व करताना करोना विषाणूच्या संपर्कात आपण येऊ नये यासाठी पोलिसांना पुरेपूर काळजी घ्यावी लागत आहे.

करोनाची लागण झालेल्या तसेच संशयित असलेल्या रुग्णांसाठी कस्तुरबा रुग्णालयात विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालयात दिवसागणिक तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हे रुग्णालय आग्रीपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असून वाढती गर्दी लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये, रुग्णांना वेळेत मदत मिळावी, तसेच रुग्णाबाबतचा नियमित तपशील घेता यावा यासाठी पोलिसांचे २० ते २५ जणांचे पथक कस्तुरबा रुग्णालय परिसरात २४ तास कर्तव्यावर असते. तपासणीसाठी येणारा कोणता रुग्ण करोनाची बाधा झालेला असेल हे सांगता येत नसल्याने मास्क, हातमोजे तसेच सॅनेटायझर याचा पोलिसांना वारंवार वापर करावा लागत आहे. एखादा नवीन रुग्ण आला तरी धडकी भरते, परंतु पोलिस म्हटल्यावर मदत करणे आणि कर्तव्य बजावणे ही प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे थोडी भीती वाटत असली तरी आपण आपली जबाबदारी पार पाडत असल्याचे एका पोलिस उपनिरीक्षकाने सांगितले.

दगावलेल्या रुग्णाचा मृतदेह कुटुंबाकडे सोपविण्याची, त्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी देखील आग्रीपाडा पोलिसांवर येते. मंगळवारी मृत पावलेल्या रुग्णाची पत्नी आणि मुलगा हे दोघेही रुग्णालयात उपचार घेत असल्याने पोलिसांनी त्यांचा मृतदेह जावयाकडे सुपूर्द केला. तत्पूर्वी पोलिसांनी जावयाचा जबाब नोंदवून घेतला. हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत असताना आणि त्याआधी दुबईहून परतल्यानंतर मृत रुग्णाच्या संपर्कात जावई आला होता. हे कळल्यानंतर पोलिसांनी सुरक्षित अंतर ठेवूनच जबाब नोंदविला. यावेळी तोंडाला मास्क लावण्यात आले होते आणि जावयाला देखील लावण्यास सांगण्यात आले. जबाब घेताना पोलिस दर दहा मिनिटांनी सॅनेटायझरने हात धुवत होते. जावयाला स्वाक्षरी करण्यासाठी दिलेला पेनही पोलिसांनी सॅनेटायझरने धुतला. कस्तुरबा रुग्णालयात वारंवार जावे लागत असल्याने आग्रीपाडा पोलिस ठाण्यात निर्जंतुकीकरण करण्याची गरज असल्याचे येथील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *