कोरोनाच्या अफवेने पोल्ट्री उद्योगाचे ६०० कोटी रुपयांचे नुकसान

चिकन खाल्ल्याने कोरोनाची लागण होते ही अफवा पसरल्याने राज्यातील पोल्ट्री उद्योग अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. लोकांनी चिकन खाणे बंद केल्यानं कोंबड्याची विक्रीत मोठी घट झाली. याचा फटका बसून राज्यातील पोल्ट्री उद्योगाचे ६०० कोटी रुपयांच्या घरात नुकसान झाल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली.

राज्यात १०० मोठ्या पोल्ट्री कंपन्या आहेत. त्यांनी जवळपास १० हजार लहान पोल्ट्री फार्म युनिटशी करार केले आहेत. तर करार न केलेले हजारो पोल्ट्री फार्म राज्यात आहेत. त्यामुळे राज्यात या सगळ्या पोल्ट्री कोरोनाच्या अफवेने उध्वस्त झाल्या आहेत.

चीनमध्ये कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याचा प्रसार अनेक देशात झाला. भारतातही सुरुवाातीला कोरोनचे संशयित रुग्ण आढळत होते. तर आता महाराष्ट्रातीलच कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १४ वर गेली आहे. मात्र या रोगाचा प्रसार होत असताना त्याबाबत विविध अफवाही सोशल मिडियावर पसरत होते. त्यातीलच एक अफवा म्हणजे, चिकन खालल्ल्याने कोरोना होतो. आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून ही अफवा पसरवल्याचे समोर आले आहे. ज्यांनी ही अफवा पसरवली त्यांचा शोधही लागला असून त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल, अशी माहितीही सुनील केदार यांनी दिली.

पोल्ट्री व्यवसायाचे झालेले नुकसान भरून देण्याची मागणी या व्यावसायिकांकडून केली जात आहे. त्यावर बोलताना केदार म्हणाले, राज्य सरकार निश्चित अडचणीच्या काळात पोल्ट्री व्यावसायिकांच्या मागे उभे राहील. केंद्र सरकारनेही पोल्ट्री व्यावसायिकांना मदत करावी. बर्ड फ्लूचा फैलाव झाला तेव्हाही पोल्ट्री व्यवसाय उद्ध्वस्त झाला होता. तेव्हा सरकारने या व्यवसायाला मदत केल्याचे सुनील केदार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *