आजारी मुलांना शाळेत पाठवू नका!

मुले आजारी असताना पालकांनी त्यांना शाळेत पाठवू नये; तसेच शाळांत गर्दी होईल, अशा कोणत्याही कार्यक्रमाचे शाळांनी आयोजन करू नये, अशा सक्त सूचना शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी य़ांनी दिल्या आहेत. शाळांनी करोनाच्या विषाणुला आळा घालण्याबाबत विद्यार्थ्यांत जनजागृती करावी, असेही सोळंकी यांनी सांगितले आहे. सध्या सुरू असणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करता येणार नसल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

पुण्यात करोनाचे रुग्ण आढळल्यावर शालेय शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली असून, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शिक्षण विभागाने कार्यवाहीस सुरुवात केली आहे. करोना विषाणुबाबत विद्यार्थ्यांत जनजागृती होणे आवश्यक असून, त्याचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यानुसार वारंवार सॅनिटायझरने हात धुणे, शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रुमाल ठेवणे, टिश्यू पेपरचा वापर करणे, आजारपणात शाळेत येऊ नये, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे, नाक, डोळे, तोंड यांना वारंवार हात न लावणे, आजारी व्यक्तीपासून एक मीटर लांब राहणे, नजीकच्या दवाखान्याला भेट देऊन तपासणी करणे अशा सूचना सोळंकी यांनी दिल्या आहेत.

शाळांनी सद्यस्थितीत मास्क घालण्याची सक्ती करू नये, अशी स्पष्ट सूचना दिली आहे. या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

पुण्यात करोनाचे दोन रुग्ण आढळल्यानंतर खासगी शाळांनी आवश्यक ती काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. अनेक शाळांच्या प्रशासनाने नोटीस काढून पालकांना सूचना दिल्या आहेत. यात मुलाला ताप, सर्दी किंवा खोकला असल्यास, त्याला घरीच आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. आजारपणातही मुलांना शाळेत पाठवल्यास पालकांना शाळेत बोलावून, त्यांच्यासोबतच परत घरी पाठवण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना शाळांनी दिल्या आहेत.

…तरीही कॉलेजांत कार्यक्रम सुरूच

‘करोना व्हायरस’च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठे आणि कॉलेजांना सार्वजनिक किंवा गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यास बंदी घातली आहे. विद्यापीठ प्रशासनाने तीन कार्यक्रमांना बंदी घातली असतानाच, कॉलेजांत पदवी प्रदान कार्यक्रम, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषद, परिसंवादांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यापीठ आणि यूजीसीच्या सूचनांची अंमलबजावणी केली जावी, अशी अपेक्षा केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *