ईशान्य दिल्लीतील हिंसाचारानंतर तेथील जनजीवन आता पूर्वपदावर येऊ लागले आहे. शनिवारी सकाळी मौजपूर आणि जाफराबादमध्ये लोक रस्त्यांवर दिसू लागले आहेत. तथापि, या सर्व भागांमध्ये पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.
>> दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांची भेट घेणार
>> मौजपूर येथे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शनिवारी सकाळी दुकाने बंद होती, परंतु ई-रिक्षा रस्त्यांवर दिसल्या.
>> ईशान्य दिल्लीतील हिंसाचार प्रकरणात एकूण ६३० लोकांना अटक केली आहे. तर या प्रकरणी एकूण १४८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
>> दंगलीबाबतचे उपलब्ध असलेले व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फूटेज तपासणीचे काम सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
>> दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसाचारावर नियंत्रण आले असून दंगलग्रस्त भागात जनजीवन पूर्ववत होत आहे. मात्र, सर्व दंगलग्रस्त भागांमध्ये पोलिस तैनात आहेत. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत शांतता समितीच्या सुमारे ४०० बैठका घेतल्या आहेत.
>> शुक्रवारी दिल्लीत झालेल्या हिंसाचारात मृतांची संख्या ४२ झाली. या हिंसाचारात २५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. प्रामुख्याने झाफराबाद, मौजपूर, चांदबाग, खुरेजी खास आणि भजनपुरा या भागांत मोठे नुकसान झाले आहे.
