मराठी भाषेचा दुर्लक्षित वारसा; आक्षीचा आद्य शिलालेख नामशेष होण्याच्या मार्गावर

मराठी राजभाषा दिनानिमित्त आज राज्यातील अनेक ठिकाणी विविध उपक्रम राबवले जातात. सरकारकडूनही यासाठी पुढाकार घेतला जातो. मात्र, निर्मितीच्या हजार वर्षानंतरही मराठी भाषेचा एक ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित असल्याचे समोर आले आहे. श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या मुर्तीजवळील शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख म्हणून ओळखला जातो. पण रायगड जिल्ह्य़ातील आक्षी येथील एक शिलालेख याहूनही पुरातन असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, दुर्देवी बाब आहे की निर्मितीच्या हजार वर्षांनंतरही हा शिलालेख दुर्लक्षित अवस्थेत पडून आहे.

श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या मुर्तीच्या पायथ्याशी मराठीत कोरलेला शिलालेख आहे. “श्री चामुंडाराये करवियले गंगाराये सुत्ताले करवियेले” हा प्राचीन भारतातील सर्वात जुना मराठी शिलालेख म्हणून ओळखला जातो. मात्र रायगड जिल्ह्य़ातील आक्षी गावात याहूनही जुना मराठीतील एक शिलालेख आढळल्याचे सांगितले जात आहे. श्रवणबेळगोळ येथील शिलालेखाची निर्मिती इ.स.१११६-१७ मध्ये झाली. पण अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील शिलालेखाची निर्मिती इ.स.१०१७ अर्थात ९३४ मध्ये झाली असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय, आक्षी येथील हा शिलालेख प्राचीन भारतातील आद्य शिलालेख असल्याचा दुजोरा इतिहास संशोधकांनी दिला असल्याचेही सांगण्यात आले आहे.

या शिलालेखावर देवनागरी लिपीत नऊ ओळी कोरण्यात आल्या आहेत. या लिपीवर संस्कृत भाषेचा प्रभाव असल्याचे पाहायला मिळते. पश्चिमसमुद्रपती श्री कोकण चक्रवर्ती केसीदेवराय यांच्या महाप्रधान भरजु सेणुई याने हा शिलालेख कोरून घेतला आहे. महालक्ष्मी देवीच्या बोडणासाठी दर शुक्रवारी नऊ कुवली धान्य देण्याचा उल्लेख इथे करण्यात आला आहे. शके ९३४ मधील प्रभव संवत्सर अधिक कृष्णपक्षातील शुक्रवारी हा निर्णय घेतल्याचे उल्लेख इथे आहे. तसेच, शिलालेखाचे विद्रूपीकरण करणाऱ्याला शापही देण्यात आला आहे.

मराठीतील या आद्य शिलालेखाच्या निर्मितीला आज हजार वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र इतिहासाच्या या अमूल्य ठेव्याच्या नशिबी मात्र प्रतारणाच आली आहे. आक्षीतील एका रस्त्याच्या कडेला हा शिलालेख धूळ खात पडला आहे. पुरातत्त्व विभागालाही याची जाणीव झाल्याचे दिसत नाही. परिणामी आक्षीत येणाऱ्या पर्यटकांनाही या शिलालेखाचे महत्त्व कळून येत नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेला एका चौथऱ्यावर हा शिलालेख दुर्लक्षित असा पडून आहे. आज मराठीचे कैवारी म्हणवणारी राजकीय नेते मंडळी या शिलालेखाच्या संवर्धनासाठी समोर येणार का? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.

…त्यावरील मजकूर नष्ट होत चालला आहे –
आक्षी येथील शिलालेखाचे जतन करणे गरजेचे आहे. या शिलालेखाचा अभ्यासही व्हायला पाहिजे. सद्यस्थितीत या शिलालेखाची दुरवस्था झाली असून, त्यावरील मजकूर नष्ट होत चालला आहे. तो कायमचा नष्ट झाल्यास या शिलालेखाला काही अर्थ उरणार नाही. किमान या शिलालेखाचे ऊन पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी व्यवस्था करणे अपेक्षित आहे. अशी भावना स्थानिक सामाजिक कार्यकर्ते मंगेश माळी यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *