अपघातानंतर पेटलेल्या गाडीत सात जण जिवंत जळाले

आग्रा – लखनऊ एक्सप्रेस वेवर घडलेल्या एका जळीतकांडानं अनेकांना हादरवून टाकलंय. ट्रकला धडकल्यानंतर गाडीनं पेट घेतला आणि या गाडीतून प्रवास करणारे सातही जण गाडीतच भस्मसात झाले. अपघातानंतर जमा झालेले प्रत्यक्षदर्शी ही सगळी घटना पाहत होते पण त्यांना या गाडीतील कुणालाही वाचवण्यात यश आलं नाही. आगीनं घेरलेल्या या गाडीत लोक अडकलेत हे दुरूनही लक्षात येत होतं कारण गाडीत अडकलेले लोक जिवाच्या आकांतानं ओरडत, किंचाळत होते. परंतु, त्यांना गाडीचा दरवाजा उघडण्यात यश आलं नाही. आग एवढ्या वेगानं पसरली की कुणाला काही करण्याची संधीच मिळाली नाही, असं प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं आहे.

रविवारी रात्री आग्रा – लखनऊ एक्सप्रेस वेवर उन्नाव टोल प्लाझाजवळ हा अपघात घडला. हा अपघात इतका भयंकर होता की ट्रकचा पुढचा भाग गाडीमध्ये घुसला होता. गाडीचा चालकही गाडीबाहेर पडण्यात आणि स्वत:ला वाचवण्यात अपयशी ठरला आणि पाहता पाहता या आगीत सात जण जिवंत जळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, गाडीतून प्रवास करणारे सातही जण शाहजहांपूरमध्ये एका लग्नात सहभागी होण्यासाठी निघाले होते. पोलिसांनी गाडी क्रमांकाची चौकशी केल्यानंतर ही गाडी अंकित वाजपेयी यांची असल्याचं समोर आलं. त्यांच्यासोबत असलेले त्यांचे चार प्रवासी सफीरपूरचे रहिवासी होते. त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याचं आणि मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

ही गाडी एलपीजीवर सुरू होती. महत्त्वाचं म्हणजे, चार चाकी गाड्यांमध्ये एलपीजी किट बॅन आहे. गाडीच्या रजिस्ट्रेशन पेपरवर ही गाडी पेट्रोलवर चालणारी गाडी म्हणून नमूद आहे. याचाच अर्थ ही गाडी अवैधरित्या एलपीजी सिलिंडरवर सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *