घरातून पळालेल्या मुलीला वडिलांची श्रद्धांजली, चौकांमध्ये लावले पोस्टर

आई-वडिलांचा विरोध डावलून घरात पळून गेलेल्या व लग्न करणाऱ्या मुलीला तिच्या वडिलांनी चक्क मृत घोषित केल्याची घटना कागल तालुक्यातील व्हन्नूर येथे घडली आहे. मुलीच्या निर्णयानं धक्का बसलेल्या वडिलांनी तिच्या श्रद्धांजलीचे पोस्टर चौकात लावले आहेत. त्यावर भावनिक मजकूरही लिहिण्यात आला आहे.

प्रेमप्रकरणांतून घरातून पळून जाऊन लग्न करण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. अशावेळी मुलीच्या कुटुंबीयांची मोठी अडचण होऊन बसते. या प्रकरणाची जाहीर वाच्यता होऊ नये असाच बहुतेकांचा प्रयत्न असतो. मात्र, व्हन्नूर गावातील एक बाप त्यास अपवाद ठरला आहे. त्यानं स्वत:च्या पळून गेलेल्या मुलीचे पोस्टर गावात लावले आहेत. भविष्यात कुठलीही मुलगी आपल्या आई-वडिलांचा विश्वासघात करून पळून जाऊ नये, या अपेक्षेनं हे पोस्टर लावल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे.

”बाळ तू जन्माला येतानाच संधीवाताचा आजार तुझ्या आईला घेऊन आलीस. त्या वेदना सहन करीत ज्या आईनं तुझे सर्व हट्ट, लाड पुरवित तुला मोठं केलं. ती दुर्दैवी आई… आजपर्यंत तुला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा… परंतु पुढच्या आयुष्यात आनंद, सुख देण्यास असमर्थ ठरलेला… ज्याला तू सोडून गेलीस… हा काळा दिवस पाहण्यासाठी जिवंत असलेला असा हा कमनशिबी बाप…” दोघेही शोकाकुल आहेत, असा मजकूर पोस्टरवर छापण्यात आला आहे. पोस्टरवर मुलीचं स्पष्ट छायाचित्र असून त्याखाली तिला ‘विश्वासघातकी’ असं म्हटलं गेलंय. या पोस्टरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

एखाद्या तरुणानं पळून जाऊन प्रेमविवाह केल्यास त्याच्या हिमतीला दाद दिली जाते. ‘तेरा प्यार जीत गया” म्हणत त्याला प्रोत्साहन दिलं जातं. याउलट अनुभव मुलीच्या व तिच्या कुटुंबीयांच्या वाट्याला येतात. खानदानाचं नाव घालवलं म्हणून तिला व तिच्या कुटुंबीयांना दोष दिला जातो. मुलींच्या बाबतीत विचार करताना आपली मानसिकताही संकुचित बनते. व्हन्नूरमधील बापानं केलेलं हे कृत्य याच मानसिकतेतून केल्याचं बोललं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *