‘अब की बार मोदी सरकार’’ अशी जोरदार जाहिरातबाजी करून सत्तेच्या गादीवर विराजमान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सामान्य जनतेला विसरले आहेत. हे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिक ‘मोदी के वजह से महंगाई की मार’ असे म्हणत आहे.
कारण सामान्य जनतेला रोजच्या जेवणात लागणा-या वस्तूंच्या दरात मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. हॉटेलमधील चटकदार जेवण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पण आता घरीही मसालेदार जेवण बनवणं शक्य नाही. कारण मसाले व मसाल्यांचे पदार्थ यांच्या किमतीत वर्षभरात १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
उन्हाळ्यातल्या दिवसांमध्ये वर्षभराच्या वापरासाठी अनेक गृहिणी मसाले बनवतात. पण हे बनवण्यासाठी लागणा-या जिन्नसांच्या (मिरची व खडे मसाले) किमतीत वाढ झाल्यामुळे यंदा अनेक स्त्रियांनी घरी मसाले बनवण्याचा खटाटोप कमी केल्याचे दिसून आले.
रोजचे जेवण चवदार व चविष्ट बनवण्यासाठी सामान्यांना नाइलाजाने मसाल्याचे पदार्थ खरेदी करावे लागत आहेत. तसेच मसाला कुटण्याचा खर्च ९०० वरून ११०० रुपयांवर गेला आहे.

