कल्याण मेट्रोचा मार्ग बदलणार, नव्याने सर्वेक्षण करण्याचे एकनाथ शिंदेंचे आदेश

कल्याण-भिवंडी तसेच कल्याण-तळोजा या दोन्ही प्रस्तावित मेट्रोमार्गामुळे मोठय़ा प्रमाणात बांधकामे विस्थापित होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्याने या दोन्ही मार्गाचे आरेखन बदलण्यासाठी नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत दिले आहेत. भिवंडी-कल्याण नियोजित मेट्रो प्रकल्पाच्या आरेखनाविषयी त्या भागातील विकासकांनीही हरकती नोंदवल्या होत्या. तसेच या प्रकल्पासाठी सध्या बांधकाम अवस्थेत असलेल्या इमारतीही पाडाव्या लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर नगरविकासमंत्र्यांच्या या आदेशाने या पट्टय़ातील विकासकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तिन्ही शहरांना जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या मेट्रोच्या मार्गासाठी भिवंडीतील वाहतुकीची धमनी समजला जाणारा धामणकर नाका उड्डाणपूल पाडावा लागेल, असा निष्कर्ष प्राधिकरणाने काढला आहे. हा पूल पाडला तर शहरात कोंडी वाढण्याची भीती आहे. धामणकर नाका परिसरात सरकारी रुग्णालय, भिवंडी न्यायालय, भिवंडी महापालिका, एसटी बस थांबा यासह अनेक महत्त्वाची खासगी कार्यालये आहेत.  येथील वाहतूक कोंडीचा भार मुंबई-नाशिक महामार्गावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय, या मेट्रो मार्गामध्ये मोठय़ा प्रमाणात बांधकामे बाधित होणार असून या नागरिकांकडून मेट्रो मार्गाचे आरेखन बदलण्याची तसेच कल्याणमधून जाणारा मेट्रो मार्गही दुर्गाडीहून थेट एपीएमसीला नेण्याऐवजी बिर्ला कॉलेजमार्गे नेण्याची मागणी  होत आहे. कल्याण-तळोजा या मेट्रो मार्गाच्या आरेखनाबाबतही  तक्रारी येऊ लागल्या होत्या.  प्राधिकरणाच्या आखणीप्रमाणे  मार्गावर काही बांधकामे बाधित होतील अशा तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही मेट्रो मार्गाचे आरेखन बदलण्यासाठी नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश एमएमआरडीएला दिले.  बैठकीला कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव, अतिरिक्त आयुक्त सोनिया सेठी आदी उपस्थित होते.

कल्याण पश्चिमला फायदा? कल्याणच्या पश्चिम भागातून जाणारी मार्गिका दुर्गाडी येथून थेट एपीएमसीला नेण्याऐवजी बिर्ला कॉलेज परिसर मार्गे नेली तर कल्याण पश्चिमेचा बराचसा भाग मेट्रो मार्गाने जोडला जाईल. त्यामुळे येथील मार्गिकेतही बदल करण्याची मागणी होत होती. त्यामुळे आरेखन बदलाच्या निर्णयाचा फायदा कल्याण पश्चिमेतील नागरिकांना होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *