‘देशद्रोहींना बिर्याणी नाही, गोळ्या घातल्या पाहिजेत’

केंद्रातील मोदी सरकारमधील मंत्री अनुराग ठाकूर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून गदारोळ सुरू झाला आहे. विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली असली तरी, भाजपचे नेते त्यांचं समर्थन करत आहेत. कर्नाटकातील मंत्री सीटी रवी यांनी अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. देशद्रोहींना बिर्याणी नाही, तर गोळ्या घातल्या पाहिजेत, असं ट्विट करून रवी यांनी खळबळ उडवून दिली आहे.

‘जे लोक केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी देशद्रोहींविरोधात केलेल्या वक्तव्यावर टीका करत आहेत, ते लोक दहशतवादी अजमल कसाब आणि याकूब मेमन यांच्या फाशीला विरोध करत होते. तुकडे-तुकडे गँगचं समर्थन करत आहेत आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात खोटं पसरवत आहेत. मी अनुराग ठाकूर यांच्या सोबत आहे,’ असं रवी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ठाकूर यांना नोटीस

निवडणूक आयोगाकडे एक अहवाल पाठवण्यात आला आहे. त्यात अनुराग ठाकूर यांनी २७ जानेवारी रोजी दिल्लीच्या रिठाला येथील निवडणूक प्रचार सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ठाकूर यांनी ‘देशातील गद्दारांना….’ असं विधान त्यांनी वारंवार केलं होतं. त्यामुळं निवडणूक आयोगानं त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ३० जानेवारी दुपारी १२ पर्यंत त्यांना उत्तर देण्यास सांगितले आहे.कपिल मिश्रांवर तात्पुरती बंदी

अनुराग ठाकूर यात दोषी आढळून आले, तर ते निवडणूक आयोगाकडून नोटीस मिळालेले दुसरे भाजपचे नेते असतील. याआधी २५ जानेवारीला निवडणूक आयोगानं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप उमेदवार कपिल मिश्रा यांच्या विरोधात तात्पुरत्या बंदीची कारवाई केली होती. दिल्लीत ८ फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान होत आहे. ११ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *