देशात दोनच मुलं जन्माला घालण्याचा कायदा आणणं आवश्यक-मोहन भागवत

देशात दोन मुलंच जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा येणं आवश्यक आहे असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरुन सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावर लोकसंख्या नियंत्रण हा विषय आहे असं दिसून येतं आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद या ठिकाणी झालेल्या संघाच्या एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरसंघचालक मोहन भागवत यांनी बंद दाराआड झालेल्या एका चर्चेत देशात दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा आणला पाहिजे असं म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

एवढंच नाही तर सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, “लवकरच एका भव्य राम मंदिराची निर्मिती करण्यात येईल. राम मंदिर ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर संघा राम मंदिराच्या मुद्द्यापासून वेगळा होईल” सध्या देशातली लोकसंख्या वाढ हा चिंतेचा विषय आहे त्यासाठी दोन मुलंच जन्माला घालण्याचा कायदा आणायला हवा असं प्रतिपादनही मोहन भागवत यांनी केलं. अशा प्रकारच्या कायदा आणल्यास लोकसंख्या नियंत्रणात येईल असंही मोहन भागवत म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता देशात दोन मुलं जन्माला घालण्याच्या कायद्यासाठी आग्रही असेल. तसंच देशात यासंबंधी जनजागृती मोहीम राबवेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी CAA अर्थात सुधारित नागरिकत्व कायद्यावरही सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतप्रदर्शन केलं. सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन मागे हटण्याची गरज नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

याआधी डिसेंबर महिन्यात देशातली 130 कोटी जनता हिंदूच आहे असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं होतं. ज्यावरुन चांगलाच वाद ओढवला होता. आता त्यांनी लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने एक वक्तव्य केलं आहे. यावरुन आता विरोधी पक्ष काही वाद निर्माण करतात का? की त्यांचं हे म्हणणं स्वीकारलं जातं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *