सेल्फी काढण्याच्या नादात तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

सेल्फी काढण्याच्या नादात पाण्यात बुडून पैठण येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे. जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी जलविद्युत केंद्राजवळ शनिवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेमुळे पैठण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विनायक सुरेश बाबर असे मृत मुलाचे नाव आहे. विनायक हा आपल्या दोन मित्रांसह जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी जल विद्युत केंद्राजवळ सेल्फी काढत होता. त्यावेळी अचानक त्यांचा तोल गेला आणि तो पाण्यात बुडाला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी तत्काळ या घटनेची माहिती स्थानिकांना दिली.

स्थानिकांनी पैठण नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पाचारण करून शोध मोहीम सुरू केली. एक तासाच्या शोध मोहिमेनंतर विनायकचा मृतदेह हाती आला. पण तोपर्यंत खूप वेळ झाला होता. विनायकचे वडील सुरेश बाबर हे पैठण नगर परिषदेचे कर्मचारी आहेत. विनायक हा सुरेश बाबर यांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेने संपूर्ण पैठणमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *