यूपीत थंडीचा कहर सुरूच, आणखी ४१ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात थंडीचा कहर सुरूच आहे. नवीन नवर्षातील दुसऱ्याच दिवशी उत्तर प्रदेशात थंडीमुळे आणखी ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच कानपूरमध्ये वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवासापासून उत्तर प्रदेशासह उत्तर भारतातील अनेक भागात प्रचंड थंडी पडली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. थंडी व धुक्यामुळे रेल्वे तसेच विमान उड्डाणांना फटका बसला आहे.

उत्तर प्रदेशात थंडी पडली असून काल सायंकाळी कानपूर, उन्नाव व जालौनमध्ये अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे दिवसभर तापमानात चढ-उतार दिसला. हवामान बदलामुळे उच्च रक्तदाब रुग्णांना मोठा फटका बसला. अनेकांचा अचानक बीपी वाढल्याने त्यांच्या मानेजवळ आर्टरीमध्ये ब्लॉकेज होत असल्याची समस्या उद्भवत आहे. उत्तर प्रदेशात गुरुवारी कानपूर शहरामध्ये १७, कानपूर ग्रामीणमध्ये ५, झांसीत ४, बांदात व महोबामध्ये प्रत्येकी ३-३ , हातरस, आग्रा, हमीरपूर मध्ये प्रत्येकी २-२, कन्नौज, चित्रकूट व अलीगडमध्ये प्रत्येकी १-१ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच वीज कोसळून कानपूरमधील नौबस्ता व कलक्टरगंज परिसरात दोघांचा मृत्यू झाला आहे.

गुरुवारी राज्यातील अनेक भागात हवामान बदलल्याचे दिसले. काही ठिकाणी पारा खाली घसरला तर काही ठिकाणी लोकांना दिलासा मिळाला. इटावात ४.८ डिग्री, बांदात ५.४ डिग्रीसह सर्वात जास्त थंडीची नोंद करण्यात आली. शुक्रवारी काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *