मुंबई: मुलीच्या प्रेमप्रकरणाला वैतागून आईनं उचललं टोकाचं पाऊल

विरोध करूनही मुलीशी प्रेमसंबंध ठेवत असल्याने मुलीच्या आईने इतर तिघांच्या मदतीने एका व्यक्तीचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना मुलुंडमध्ये उघडकीस आली आहे. बाबू चेट्टीयार (२८) असे त्याचे नाव आहे. त्याला मारून मृतदेह कल्याण येथे फेकण्यात आला होता. याप्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुलीच्या आईला ताब्यात घेण्यात आले आहे.

बाबू हा विवाहित होता व त्याला एक मुलगीदेखील आहे. मात्र दारूचे व्यसन आणि अनेक किरकोळ गुन्हे दाखल असल्याने त्याची पत्नी सहा महिन्यांपूर्वीच त्याला सोडून गेली होती. त्यानंतर तो आई आणि भावासोबत राहत होता. शुक्रवारी रात्री उशिरा पाच रस्ता परिसरात सार्वजनिक ठिकाणी दारू पित बसलेल्या बाबू आणि त्याच्या दोन मित्रांना मुलुंड पोलिसांनी ताब्यात घेतले. एका नातेवाईकाने जबाबदारी घेतल्याने पोलिसांनी त्यांना सोडून दिले. पोलिस ठाण्याबाहेर आल्यानंतर नातेवाईकाच्या काही लक्षात येण्याआधीच काही जणांनी बाबूला रिक्षात बसविले आणि घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी बाबू घरी न आल्याने पोलिसांत तो हरवल्याची तक्रार करण्यात आली. अपहरणाचा गुन्हा दाखल करीत पोलिसांनी एका ४० वर्षांच्या महिलेला ताब्यात घेतले. तिने भाऊ, मेहुणा आणि रिक्षाचालकाच्या मदतीने बाबूची हत्या करून त्याचा मृतदेह शहापूरजवळ महामार्गावर टाकल्याचे सांगितले. मुलुंड पोलिसांनी याबाबत कल्याण पोलिसांना माहिती दिल्यानंतर बाबूचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. वारंवार विरोध करूनही मुलीचे बाबूसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. त्यामुळे त्याचा काटा काढण्यासाठी हे कृत्य केल्याचे ताब्यात घेतलेल्या महिलेने सांगितले. हत्येनंतर फरार झालेल्या इतर तीन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *