EMI भरण्यासाठी ९ लाखांचे कांदे चोरले!

चोर सामान्यपणे दागदागिने, पैसे असा ऐवज चोरतात.. पण बेंगळुरूत एक अजब चोरी झाली. चोरांनी चक्क ४,७०० किलो कांदे चोरले! कांद्यांनी सोन्याचेच दर गाठायचे शिल्लक ठेवलेत त्याला हे चोर तरी काय करतील बापडे.. बरं गंमत म्हणजे चोरी तरी का केली तर ट्रकचा EMI भरण्यासाठी!! तब्बल नऊ लाख रुपये किंमतीच्या कांद्याची ही चोरी कशी झाली वाचा…

बेंगळुरूतल्या तवारेकेरे पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकांना शुक्रवारी एका रस्त्याशेजारी एक ट्रक उभा केलेला दिसला. त्यांना काहीतरी गडबड वाटली. त्यांनी चौकशी केली असता कळलं की ट्रकमध्ये भरलेल्या कांद्याच्या निम्म्या गोणी गायब आहेत. या महिला पोलीसांना गडबड अशासाठी वाटली की त्या गस्तीवर होत्या आणि अर्धा तासापूर्वीच या भागातून गेल्या तेव्हा येथे कुठलाही ट्रक नव्हता.

यानंतर त्या पोलिसांनी अन्य पोलिसांच्या मदतीने ट्रक चालक आणि त्याच्या सोबत्यांची कसून चौकशी केली, तेव्हा त्यांना आपला गुन्हा कबूल केला. त्यांना सांगितलं की हिरियूरमध्ये आम्ही कांद्याच्या ८१ गोणी उतरवल्या आणि त्या शहरात बाजारात नेण्यासाठी दुसऱ्या गाडीत भरल्या. त्यानंतर त्यांनी हा ट्रक दरीत ढकलून दिला. हा कांदा तब्बल ४,७०० कि.ग्रॅ. वजनाचा होता. चालक संतोष कुमार आणि चेतनच्या म्हणण्यानुसार, त्यांनी जाणूनबुजून ट्रक ढकलून दिला. कांदा व्यापारी शेख अली आणि त्याच्या दोन मुलांनाही याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मुख्य संशयित असलेला ट्रक मालक चेतन फरार आहे. पोलिसांना संशय आहे की ट्रकचं थकित कर्ज फेडण्यासाठी त्याने हे सर्व नाटक करून कांदे चोरले.

एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘त्याने हा प्लान बनवला कारण त्याला आपल्या चालकांची आणि शेख अलीची (कांदा व्यापारी) मदत करायची होती. नंतर ट्रक दुरुस्तीसाठी इन्शुरन्स क्लेम करता येईल, असा त्याचा प्लान असावा.’ पोलिसांनी कांदे ताब्यात घेतल्यानंतर ते कांदा व्यापारी आनंद कुमार यांना देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *