प्रदुषणाच्या नवनव्या उच्चांकांमुळे दिल्लीत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा दिल्लीतील हवेची गुणवत्ता आणखी खालावल्याचे दिसून आले. जागतिक क्रमवारीत दिल्लीचा एअर क्वॉलिटी इन्डेक्स ५२७ पेक्षा अधिक होता. याचा अर्थ दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे. यापाठोपाठ पाकिस्तानातील लाहोर, कराची आणि भारतातील कोलकाता आणि मुंबईचाही प्रदूषित शहरांमध्ये समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर उपाययोजन राबवल्या जात आहेत. मात्र, त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही.
दिवाळीत दिल्लीत फटाके उडवण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यामधून बाहेर पडणारा धूर वायू प्रदूषण वाढण्यास कारणीभूत ठरतो. याशिवाय, हरयाणा व पंजाबमध्ये दरवर्षीप्रमाणेच पिकांचे अवशेष जाळण्यातूनही प्रदूषण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वायू प्रदुषणाने कमाल मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे लोकांसाठी श्वास घेणेही अवघड झाले आहे. प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने आरोग्याविषयक आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
तसेच सर्वोच्च न्यायालयाने राजधानी दिल्लीच्या परिक्षेत्रातील सर्व प्रकारची बांधकामे, बेकायदा बांधकामांवरील कारवाई आणि कचरा जाळण्यावर बंदी घातली आहे. वायू प्रदूषणामुळे लोक त्यांच्या आयुष्यातील मौल्यवान वर्षे गमावत आहेत, अशी उद्विग्नता व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील प्रदूषणावर उपाययोजना करण्यात अपयशी ठरलेल्या संबंधित यंत्रणांना धारेवर धरले होते.
