चंद्रपुरातल्या सिरणा नदीत जायबंदी होऊन अडकलेल्या वाघाचा अखेर मृत्यू झाला आहे. बुधवारी हा वाघ नदीपात्रातील खडकांमध्ये अडकला होता. त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र आज पहाटे या वाघाचा मृत्यू झाला. वाघाला वाचवण्यासाठी सुरु असलेली मोहीम बुधवारी संध्याकाळी अंधार पडल्याने थांबवण्यात आली होती. आज पहाटे पुन्हा एकदा ही मोहीम सुरु करण्यात येणार होती. मात्र त्यापूर्वीच या वाघाचा मृत्यू झाला. या वाघाने पुलाखाली उडी मारली होती. त्यामुळे तो जायबंदी झाल्याची माहिती बुधवारी मिळाली. पुलावर दोन चारचाकी गाड्या विरुद्ध दिशेने येत होत्या. त्यावेळी वाघ पुलावर होता, जो गाड्यांमुळे घाबरला असावा आणि त्याने पुलाखाली नदीत उडी मारली असावी असा अंदाज व्यक्त होतो आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चारगाव गावाजवळील नागोराव पाटील यांच्या शेताशेजारच्या नदीपात्रामध्ये वाघ अडकला होता. या वाघाला वाचवण्यासाठी वनअधिकाऱ्यांनी घटनास्थी धाव घेतली. या वाघाचे तोंड दोन दगडाच्या फटीमध्ये अडकले होते. गेल्या अनेक तासांपासून अडकून पडलेल्या या वाघाचा श्वास सुरू होता. मात्र त्याला झालेली जखम पाहता तो वाचण्याची शक्यता कमी असल्याची माहिती वनकर्मचाऱ्यांनी दिली होतो.
या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती म्हैसेकर यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गेल्या आठवडाभरापासून या परिसरातील चारगाव,कुनाडा, देऊरवाडा परिसरात वाघाने दहशत निर्माण केली होती. दोन दिवसापूर्वी चारगाव येथील बैलावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली होती. हा पट्टेदार वाघ नर असून तो वयात आल्याने तो मादीच्या शोधात भटकत आला असावा अशी माहिती वनअधिकाऱ्यांनी दिली आहे.
