मराठवाड्यात आज वादळी पावसाचा इशारा…

अवकाळीच्या फटक्याने मराठवाड्यातील पिकांचे मोठे नुकसान केले असून, पाऊस मात्र जाण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार बुधवारी (सहा नोव्हेंबर) औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे.

मराठवाड्यात ३१ ऑक्टोबरनंतरही रोज कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत असून, गेल्या चार दिवसांमध्ये विभागात २७ मिलीमीटर अवकाळी पाऊस बरसला. या पाच दिवसांमध्ये सर्वाधिक ४१.९० मिलीमीटर पाऊस औरंगाबाद जिल्ह्यात झाला असून, त्या पाठोपाठ ४० मिलीमीटर पाऊस जालना जिल्ह्यात झाला आहे. परभणी जिल्ह्यात ३१.६८ मिलीमीटर, हिंगोली २३.७२, नांदेड १७.४३, बीड २८.१०, लातूर २६.१४, उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांमध्ये १२.४० मिलीमीटर पाऊस झाला आहे.

मोसमी पावसाच्या नोंदीमध्ये आतापर्यंत विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी व नांदेड जिल्ह्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झालेला आहे. विभागात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. एकट्या ऑक्टोबर महिन्यात ६४.९२ मिलीमीटर अपेक्षित पाऊस असताना प्रत्यक्षात मात्र २१९.३२ मिलिमीटर पाऊस झाला म्हणजे अपेक्षित पावसाच्या तुलनेत तब्बल ३३७ टक्के अधिकचा पाऊस झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *