नाचणाऱ्या आणि दुध पिणाऱ्या सापांचे खरे सत्य

श्रावणाचा महिना आला की उत्तर भारतात अनेक ठिकाणी गारूडी दिसायला लागतात. हे गारूडी टोपलीत सापांना घेऊन येतात. त्यांच्या बासरीच्या तालावर सापाला नाचवतात. हे साप दूधही पितात. पण वास्तवात मात्र या सापांचे विषारी दात काढून टाकले असतात, त्यांना अनेक दिवस तहानलेलं आणि भूकेलं ठेवलं असतं आणि ते अत्यंत तडफडून मरतील अशी व्यवस्था केली असते. सापांचा खेळ करणं कायद्याने गुन्हा असूनदेखील मोठ्या प्रमाणात हा जीवघेणा खेळ सुरू आहे.

उत्तर भारतातील जंगलांत आजही मोठ्या प्रमाणात विषारी नाग आणि साप आढळतात. पावसाळ्यामध्ये प्रजननामुळे त्यांची संख्या वाढते. श्रावणाच्या महिन्यांत नागाची सर्वत्र पूजा केली जाते. हे लक्षात घेऊन उत्तर भारतातील गारूडी नागांच्या आणि सापांच्या शोधात रानोमाळ फिरतात. अंधाऱ्या ढोलीतून, बिळांमधून विषारी सापांना बाहेर काढतात. त्यांचे तोंड शिवतात. विषारी दात काढून टाकतात. ते बिनविषारी होतील यासाठी अनेक दिवसं त्यांना भूकेलं ठेवलं जातं. प्यायला पाणीही दिलं जात नाही. त्यानंतर शहरांमध्ये टोपल्यांमध्ये भरून या सापांना घेऊन येतात. भूकेने आणि तहानेने व्याकूळ झालेले साप जेव्हा संगीत बासरीचं संगीत ऐकतात तेव्हा खाद्य आहे असं समजून हल्ला करण्यासाठी त्या आवाजाच्या दिशेने फिरू लागतात. यामुळे साप डोलतोय, नाचतोय असा भास पाहणाऱ्यांना होतो. सापांसाठी खरंतर दूध विष असतं. साप मासांहारी असतात. दूध प्यायल्यामुळे दुर्धर आजार जडून त्यांचा मृत्यू होतो. पण अनेक दिवसांपासून तहानले असल्यामुळे तहान भागवण्यासाठी देण्यात येणारं दूध ते लगेच पितात. शहरातील, गावातील भाविकांना आपण त्यांना नैवेद्य दाखवतोय असं वाटतं. पण वास्तवात ते त्यांना मृत्यूच्या दारात ढकलत असतात. हे दूध पिऊनच हळूहळू या सापांचा मृत्यू होतो. एक साप मेला की गारूडी टोपलीतून दुसरा साप काढतो.

१९७२मध्ये पारित झालेल्या वन्यजीव कायद्यानुसार सापांच्या जीवाशी खेळ करणं खूप मोठा अपराध आहे. सापांचा अभ्यास करणारे डॉ. सूर्य प्रकाश असा प्रश्न विचारतात की जर सापाला तुम्ही देव मानता तर मग त्यांना मारता का? त्यांचा असा छळ का करता?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *