उल्हासनगर: येथील लिंकरोड परिसरात असलेल्या महक अपार्टमेंटया पाच मजली इमारतीला सोमवारी सकाळी अचानक विविध भागात तडे गेले. तसेच इमारत एका बाजूला झुकल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे येथील नागरिकांनी तत्काळ याबाबत अग्निशमन दलाला माहिती दिली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेत या इमारतीतील ३१ कुटुंबांना घरे रिकामी करण्याचे आदेश देत ही इमारत सील केली. त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. उल्हासनगर शहरात गेल्या महिन्यातच एका इमारतीचा स्लॅब कोसळून अडीच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. त्यातच सोमवारी पहाटे उल्हासनगर कॅम्प नंबर दोन भागातील लिंकरोड परिसरात असलेली महक या इमारतीतील १०२ फ्लॅटचे दरवाजे आतून उघडत नव्हते. त्यामुळे घाबरलेल्या रहिवाशांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधत मदत मागितली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत, या फ्लॅटचा दरवाजा उघडून दिला. अन्य सदनिकाधारकांचेही दरवाजे उघडत नसल्याने अग्निशमन दलाने, इमारतीची पाहणी केली असता, इमारतीचा खांब खचल्याची बाब निदर्शनास आली. तसेच या प्रभागातील लोकप्रतिनिधी नरेंद्र ठाकूर आणि नारायण पंजाबी यांनी या घटनेची माहिती वास्तुविशारद भूषण कटारिया यांना दिल्यानंतर त्यांनीही इमारतीची पाहणी केली. त्यांना इमारतीचा मधला खांब खचल्याचे आढळले. याबाबत महापालिकेचे सहाय्यक आय़ुक्त गणेश शिंपी यांना कळवले. यानंतर शिंपी यांनी रहिवाशांना पंधरा मिनिटांचा वेळ देत, घरातील मौल्यवान वस्तू सोबत घेऊन इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले. अग्निशमन दलाने या इमारतीतील प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढले. महापालिकेने ही इमारत सध्या सील केली आहे. त्यामुळे वेळेवर सर्व बाबी निदर्शनास आल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र महक अपार्टमेण्ट धोकादायक इमारतींच्या यादीत नसतांनाही या इमारतीला तडे गेल्याने इमारतींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
