जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तान चांगलाच चवतळा असल्याचे दिसत आहे. काल भारताबरोबर व्यापारी संबंध तोडल्यानंतर आज भारत-पाकिस्तानमध्ये धावणारी समझोता एक्सप्रेस कायमस्वरूपा बंद करण्यात आली असताना, आता पाकिस्तानी चित्रपटगृहांमध्ये भारतीय चित्रपटा प्रदर्शित करण्यावरही बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या माहिती व प्रसारण मंत्रालया मंत्रालयाच्या सहाय्यक डॉ. फिरदौस आशिक अवाण यांनी म्हटले आहे की, काश्मिरच्या विशेष स्वायत्ततेचा अधिकार काढून घेण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर पाकिस्तानने भारताशी राजनैतिक आणि सांस्कृतिक संबंध कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत.
माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, सर्व प्रकारच्या भारतीय सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्याचे धोरण तयार केले जात आहे. तसेच, भारताने जम्मू-काश्मीरचे ३७० कलम रद्द केलेले असल्याने पाकिस्तानकडून काश्मीरी जनतेला पाठींबा देण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब केला जाईल, असेही त्यांनी म्हटले.
