गेल्या काही दिवसांपासून पुणे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरण १०० टक्के भरले आहे. उजनी धरणातून व वीर धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे चंद्रभागा नदी भरून वाहत आहे. चंद्रभागा नदीमध्ये ४ लाख क्युसेकपेशा जास्त पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे चंद्रभागा नदी काठच्या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे.
चंद्रभागा नदी काठच्या हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. तसेच प्रशासनामार्फत त्यांची राहण्याची सोय व विठ्ठल मंदिर समिती मार्फत त्यांना जेवणाची सोय करण्यात आली आहे. चंद्रभागा नदीवरील नवीन पूल व अहिल्या पूल हेदेखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. यामुळे नवीन पुलावरून वाहतूक थांबविण्याचे नियोजन करणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
उजनी धरण आणि नीरा नदीतून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीवर असलेले दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर , डारकवठे ,सादेपूर, औज (म) आणि चिंचपूर यासह अन्य दोन असे सातही कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्यात बुडाले आहेत या पूर स्थितीमुळे कर्नाटकाकडे जाणारी अनेक वाहने नदीकाठीच खोळंबल्याचे चित्र दिसून येते.
