बडोद्यात पुरानंतर आता मगरींचा हैदोस

विश्वामित्री नदीला आलेल्या पुराने गुजरातमध्ये झालेली भयावह स्थिती आता सुरळीत होत आहे. या पुरामुळे चार कामगारांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे पुराच्या पाण्यासोबत अनेक मगरी शहरात आल्या असून, त्यांना पकडण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. नदीकाठच्या राजमहल आणि फतेहगंज या भागांतून वनविभागाने गुरुवारी तीन व शुक्रवारी चार मध्यम आकाराच्या मगरी पकडल्या आहेत.

 मुसळधार पावसाने आलेल्या पुरामुळे बडोद्यातील पाच हजार ७०० जणांना स्थलांतर करावे लागले आहे. शहरातील साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे बडोद्याच्या जिल्हाधिकारी शालिनी अगरवाल यांनी सांगितले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर बोलणे झाले असून, केंद्राकडून मदत देण्यात येणार असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.

शुक्रवारी राजकोट येथे पत्रकारांशी बोलताना रूपानी म्हणाले, ‘ज्या नागरिकांना अन्यत्र हलवले आहे, त्यांना रोख रकमेची मदत करण्यात येणार असून, त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. पुरामध्ये ज्यांनी वस्तू किंवा गृहोपयोगी वस्तू गमावल्या आहेत, त्यांना भरपाई मिळेल.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *