धरण खेकड्यांमुळे फुटू शकतं- आदित्य ठाकरे

राज्याचे जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी तिवरे धरणफुटीप्रकरणी धरण खेकड्यांमुळे फुटल्याचा दावा केल्यानंतर आता शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही धरण खेकड्यांमुळे फुटू शकतं याला दुजोरा दिला आहे.

‘धरण अनेकदा घर्षणामुळे फुटते. दगडावर पाण्याची लाट आदळत राहीली तरीही धरणाचे नुकसान होते. तसेच कुठेही जास्त अॅक्टिव्हिटी झाली तरी ते होऊ शकते. खेकड्यांच्या अॅक्टिव्हिटीमुळे हे घडले असावे, असं गावकऱ्यांचंही मत आहे’, असं आदित्य ठाकरे म्हणाले. ते सोलापुरात ‘आदित्य संवाद’ कार्यक्रमामध्ये बोलत होते.

‘काहीजण म्हणतात खेकड्यांमुळे धरण फुटू शकतं तर काहीजण नाही म्हणतात, मला तुमच्याकडून सत्य जाणून घ्यायचं आहे’, असा प्रश्न एका विद्यार्थ्याने आदित्य यांना विचारला.

‘खरंतर हा प्रश्न तुम्ही इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना विचारला पाहिजे. धरण हे झीज झाल्यामुळे फुटू शकतं. एखाद्या दगडावर पाण्याची लाट आदळत राहिली की दगडाची झीज होऊ शकते. तसंच खेकड्यांमुळे धरण फुटलं असं तिथल्या गावकऱ्यांना वाटलं, असं होऊ शकतं. ‘इतर काही धरणांमध्येही अशी समस्या निर्माण होऊ शकते का? यावरही काम सुरु आहे’, असं आदित्य म्हणाले. धरण कसं फुटलं यावर आता चर्चा करत बसण्यापेक्षा आहेत ती धरणं अधिक सुरक्षित करण्यावर आणि धरणांची संख्या वाढवण्यार भर दिला पाहिजे’, असंही आदित्य यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *