आयपीएल सामन्यांवेळी गोंगाट होणारच: हायकोर्ट

आयपीएल क्रिकेट सामन्यांवेळी ध्वनी प्रदूषण झाल्यास दंड ठोठावण्याची मागणी करणारी याचिका सोमवारी मुंबई हायकोर्टानं फेटाळली. सामन्यांवेळी ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. क्रिकेटचा सामना उत्कंठावर्धक होत असेल आणि खेळाडूंना प्रोत्साहन देत असताना गोंगाट होणारच, असं मत हायकोर्टानं नोंदवलं. अॅड. कपिल सोनी यांनी २०१४मध्ये याचिका दाखल केली होती. २०१३मध्ये मुबईच्या वानखेडे स्टेडियम आणि पुण्याच्या सहारा स्टेडियमवरील सामन्यांदरम्यान ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक कायद्यातील नियमांचे उल्लंघन झाले होते, असा आरोप त्यात करण्यात आला होता. बीसीसीआय आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही केली होती. सामने रात्री आठ वाजता सुरू झाले आणि रात्री १२ पर्यंत सामने आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम सुरूच होते, असेही याचिकेत नमूद केले होते. या याचिकेवर मुख्य न्यायाधीश प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

क्रिकेट सामन्यावेळी फलंदाजानं चौकार अथवा षटकार लगावला किंवा एखादा खेळाडू बाद झाला तर, प्रेक्षक गोंगाट करणारच. लोकांना थोडा आनंद लुटू दे. त्यांचे मनोरंजन व्हायला हवे, असे मत नोंदवून कोर्टानं याचिका फेटाळून लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *