एका दिवसात वाढले पाच लाख प्रवासी

बेस्टच्या इतिहासात प्रथमच एका दिवसात तब्बल पाच लाख प्रवाशांची वाढ होण्याचा विक्रम मंगळवारी नोंदवला गेला. या दिवशी ५,०२,८१३ प्रवाशांची वाढ नोंदवली गेली. ही वाढ सुमारे ३० टक्क्यांपर्यंत गेली आहे. उपक्रमाने साध्या बसचा प्रवास किमान पाच आणि एसी बसचा प्रवास किमान सहा रुपये जाहीर केल्याने बेस्टच्या बसगाड्या बुधवारीही तुंडुंब भरलेल्या दिसल्या. स्वस्त तिकीटदरामुळे प्रवासी रिक्षा, टॅक्सीकडे पाठ फिरवत पुन्हा बेस्टकडे वळत आहेत.

बेस्टच्या स्वस्त प्रवासाचे मुंबईकरांनी जोरदार स्वागत केले. त्यामुळे मंगळवारपासूनच बेस्टमध्ये प्रचंड गर्दी होऊ लागली. यापूर्वी बेस्टने साध्या बसचे तिकीट आठ रुपये केल्याने प्रवासी नाराज होते. वाहतूककोंडी, कमी बससंख्या आदी कारणांमुळे प्रवासी बेस्टपासून दुरावले होते. पण स्वस्त तिकीट आणि नवीन बस सेवेत दाखल करण्याच्या घोषणेने मुंबईकरांनी पुन्हा बेस्टला साथ दिली आहे. त्याचे परिणाम तिकीटकपातीच्या पहिल्याच दिवसापासून जाणवू लागले.

तिकिटांचे दर पाच रुपयांच्या पटीत असल्याने कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये वाद होताना दिसले नाहीत. मंगळवारी नेमकी किती प्रवासी संख्या वाढली याचा आढावा परिवहन विभागाने घेतला असता ८ जुलैच्या तुलनेत ९ जुलैच्या प्रवासी संख्येत ५ लाखांनी वाढ झाल्याचे आढळले. मंगळवारी एकूण २२ लाख १८ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. सोमवार, ८ जुलै रोजी ही संख्या १७ लाख १५ हजार प्रवाशांपुरता मर्यादित होती. ही वाढ २९.३१ टक्के इतकी नोंदवली गेली. पण यामुळे बेस्टला ३१.५५ टक्के नुकसान सहन करावे लागले. सोमवार, ८ जुलै रोजी बेस्टच्या खजिन्यात प्रवासी तिकिटातून २ कोटी १२ लाख रुपये जमा झाले होते. हा आकडा मंगळवारी घटून १ कोटी ४५ लाखांपर्यंत कमी झाला. मात्र या आकडेवारीत पासधारक प्रवाशांचा समावेश नाही. त्यामुळे प्रवासी आणि महसुलात आणखी वाढ झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

शेअर रिक्षा दरांतही कपात?

बेस्टची स्पर्धा वाढल्याचे लक्षात येताच शेअर रिक्षाचालकांनी तातडीने दरांमध्येही कपात केल्याचाही अनुभव प्रवाशांना येत आहे. बोरिवली ते पश्चिम द्रुतगती महामार्गावर शेअर रिक्षासाठी १५ रुपये आकारले जात, ती रक्कम १० रुपये झाली. याचप्रकारे विविध मार्गांवरही दरांमध्ये घट झाल्याचाही अनुभव प्रवाशांनी सांगितला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *