महाराणा प्रताप चौकात आंदोलनानंतर पाणीपुरवठा

सात महिन्यांपासून अपुऱ्या पाणीपुरवठ्याने त्रस्त असलेल्या महाराणा प्रताप चौक परिसरातील नागरिकांनी शुक्रवारी रास्तारोका आंदोलन केले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्यानंतर काहीवेळाने पाणीपुरवठा सुरळीत झाली. महापालिकेच्या मुख्य इमारतीपासून काही अंतरावर असलेल्या महाराणा प्रताप चौकात गेल्या सात महिन्यांपासून अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सकाळी चार ते आठ या वेळेत सोडण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा वेळेत बदल केल्याने परिसरातील पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ उडाला आहे. सायंकाळच्या सत्रात केवळ एक तास आणि ते देखील कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. तरीही बदल न झाल्याने आंदोलन करण्यात आले.

माजी स्थायी समिती सभापती रमेश पोवार यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात महिला घागरी घेवून सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे काही क्षणात येथे वाहतूक कोंडी निर्माण झाली. याची माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी तातडीने हजर झाले. त्यांनी शनिवारपासून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. पण त्याला विरोध करत आजच पाणी सोडण्याची मागणी केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर पाणी सोडण्यात आले. मात्र शनिवारपासून नियमितपणे सकाळी पाणी न सोडल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. यावेळी अनिल पोवार, स्वप्नील गवळी, संभाजी गोंदकर, महेश हावळ, अस्लम नदाफ यांच्यासह परिसरातील महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *