‘जय श्रीराम’ म्हणण्यासाठी धमकावले; तिघांना अटक

जय श्रीराम’ म्हणण्याच्या सक्तीवरून देशभरात मारहाणीच्या घटना समोर येत असताना, ठाण्यात ओला कारचालकाला मारहाण करत ‘जय श्रीराम’ म्हणण्यास धमकावल्याचा प्रकार पुढे आला आहे. दिव्यात ही घटना घडली असून, मुंब्रा पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

मुंब्रा येथील फैसल उस्मान खान (२५) ओला कंपनीची कार चालवतो. रविवारी पहाटे दिव्यातील आगासन रोडवरून भाडे घेतल्यानंतर त्याने कार चालू करण्याचा प्रयत्न केला. मात्र कार सुरू न होता रस्त्यातच बंद पडली. त्यावेळी याठिकाणी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी रस्त्यात गाडी का उभी केली, अशी विचारणा करत खानला शिवीगाळ व मारहाण करण्यात सुरुवात केली. या प्रकारामुळे कारमधील प्रवासी निघून गेला. दरम्यान, अधिक मारहाण न करता सोडून देण्याची विनवणी करणाऱ्या खानला आरोपींनी ‘जय श्रीराम’ म्हणण्यास धमकावले. हा प्रकार त्याने घरी सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. खानने पोलिसांना आरोपींच्या दुचाकीचा नंबर दिल्यानंतर त्या माहितीच्या अधारे त्यांना अटक करण्यात आली. मंगेश मुंढे (३०), अनिल सूर्यवंशी (२२) आणि जयदीप मुंढे (२६) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपी दिव्यातच राहत असून, दारूच्या नशेत त्यांनी हा गुन्हा केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर  यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *