आठ वर्षांच्या बालिकेचा होरपळून मृत्यू

आठ वर्षाच्या बालिकेचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री अनगोळमधील रघुनाथ पेठ भागात घडली. कस्तुरी रामू मलतवाडी (८) असे मृत मुलीचे नाव आहे. देवासमोरील दिव्याची पेटती वात उंदराने कपड्यावर आणून टाकल्याने अंथरुणासह घराने पेट घेतला आणि त्यात कस्तुरीचा होरपळून मृत्यू झाला.

अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री मलतवाडी कुटुंबीय जेवण करून नेहमीप्रमाणे झोपले होते. मेंढपाळ असणारे वडील बकरी घेऊन बाहेर गेलेले असल्याने घरात आई व तीन मुले होती. रात्री दीडच्या सुमारास दिव्यातील पेटती वात उंदराने तोंडात धरून घरात ठेवलेल्या कपड्यावर आणून टाकली. आधी कपड्यांनी पेट घेतला, त्यानंतर इतर वस्तू पेटल्या. यावेळी जागे झालेल्या आईने बाजूला झोपलेला एक मुलगा व दुसऱ्या मुलीला हाताला धरून घराबाहेर आणले, परंतु अचानक लागलेल्या आगीमुळे घरात कस्तुरी झोपल्याचे भान आईला राहिले नाही. दहा मिनिटानंतर तिला कस्तुरीची आठवण झाली, तिने अग्निशामक दलाच्या जवानांना आपली आणखी एक मुलगी आतच राहिल्याचे सांगितले. यावेळी जवानांनी धावपळ करत आत प्रवेश केला. परंतु, संपूर्ण घराला वेढलेल्या आगीमुळे कस्तुरीचा होरपळून जागीच मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *