झारखंडच्या गढवा जिल्ह्यात मंगळवारी रात्रीच्या अंधारात झालेल्या बस अपघातात आत्तापर्यंत सहा जण ठार झाल्याची माहिती मिळतेय तर ३९ जण गंभीररित्या जखमी आहेत. ही बस छत्तीसगडच्या अंबिकापूरहून गढवाकडे निघाली होती. वाहन चालकाला डुलकी लागल्यानं बस दरीत कोसळून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती हाती येतेय. अन्नराज घाटात हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक मदत यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक रहिवासी आणि पोलीस प्रशासनाकडून अद्यापही बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळावर आणखीही काही लोक अडकलेल्या अवस्थेत असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. जिल्हा प्रशासनानं आत्तापर्यंत सहा जणांच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिलाय परंतु, मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येत वाढ होऊ शकते.
मंगळवारी रात्री जवळपास २.०० वाजल्याच्या सुमारास हा अपघात घडला. सर्व जण गाढ झोपेत असताना अन्नराज घाटात चालकाचा बसवरचा ताबा सुटल्यानंतर रेलिंग तोडत ही बस दरीत कोसळली. या धोकादायक घाटात याआधीही असे अनेक अपघात झालेले आहे.
