राज्यातील ५३% पुरुष तर ४२% महिला अविवाहित: सर्वे

राज्यातील ५३.५ टक्के पुरुष तर ४२.५ टक्के महिला अविवाहित असल्याचं आर्थिक सर्वेक्षण २०१८च्या अहवालात स्पष्ट झालं आहे. राष्ट्रीय सरासरीपेक्षा राज्यातील अविवाहित पुरुषांचे आणि महिलांचे प्रमाण कमी आहे. स्थलांतर ,बेरोजगारी, बदलती जीवनशैली अशा अनेक कारणांमुळे अविवाहितांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अर्थसंकल्प सादर करण्याआधी २०१८च्या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला. या अहवालात राज्यातील अविवाहित पुरुष आणि महिलांच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. देशात आज ५४.४ टक्के पुरुष, तर ४४.८ टक्के महिला अविवाहित आहेत. या तुलनेत राज्यातील अविवाहितांचे प्रमाण कमी आहे.

वाढती स्थलांतर, प्रदीर्घ काळ चालणारं शिक्षण, बेरोजगारी ,कंत्राटी नोकऱ्या अशा अनेक कारणांमुळे अविवाहितांचे प्रमाण वाढल्याची चर्चा आहे. गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागातून शहरी भागात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यांत होणाऱ्या स्थलांतरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहेत. आर्थिक किंवा शैक्षणिक कारणांसाठी ही स्थलांतर केली जात असून याचा सरळ परिणाम विवाहसंस्थेवर होतो आहे. ‘ स्थलांतरामुळे अनेक जण लग्न करत नाहीत. तसंच शिक्षण, कृषी संस्कृतीपासून दूर जाणं, नोकरीची जीवघेणी स्पर्धा या सगळ्यामुळे तरुण पिढीचा लग्नाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो आहे’ असं मत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथील प्राध्यापक डॉ. विभूती पटेल यांनी व्यक्त केलं आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणाईमध्ये उशिरा लग्न करण्याचं प्रमाण वाढतं आहे. तसंच बेरोजगारी आणि कंत्राटी नोकऱ्यांमुळेही अनेक तरुणांची आज लग्न होत नाहीयेत.

दुसरीकडे शहरी भागात ‘लिव्ह इन रिलेशनशीप’च्या वाढत्या आकर्षणामुळे अविवाहितांच्या संख्येत वाढ झाली असल्याची माहिती मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राच्या प्राध्यापक मृदूल निळे यांनी दिली आहे. यासंदर्भात सीएसडीएसने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातही शहरी भागातील तरुण पिढी लग्नापेक्षा लिव्ह इन रिलेशनशीपलाच जास्त प्राधान्य देत असल्याची बाब समोर आली आहे.

याशिवाय घटस्फोटीत/ विधवा/ विभक्त यांच्या प्रमाणातही राज्यात किंचित वाढ झाली आहे. राज्यातील १.५ टक्के पुरुष तर ६.४ टक्के महिला या प्रवर्गात मोडत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *